आपण हे करायचे का ??

“आपण करायचं का हे? काय वाटतं सगळ्यांना?” अशी या सगळ्याची सुरुवात झाली.

लहान लहान मुलं. स्कूलबसच्या हॉर्नच्या आवाजावर सोसायटीच्या पेव्हमेंटवर आपली नाजूक पावलं दुडदुडत टाकत आपल्या कार्टूनच्या सॅक्स सांभाळत त्या दिशेने धावणारी मुलं आणि पाठीमागे त्यांचे उरलेलं सामान घेऊन धावणार्‍या मम्मीज. किती सुरेख चित्र आहे नं. पण सगळ्याच गोंडस मुलांच्या नशिबी असं चित्र असतेच असं नाही. कित्येक मुलांना शाळा म्हणजे काय आणि तिथे का जायचं असतं हेच माहित नसतं. आम्ही नाही का न शिकता जगलो, तसंच आमची मुलं जगतील अशाच समजुतीत त्यांचे पालक. पण हेच चित्र बदलण्यासाठी काही मंडळी मनापासून झटतायेत, नव्हे आपलं सगळं आयुष्य त्यांनी तिथे समर्पित केलंय. असेच एक कुटुंब म्हणजे आमटे परिवार. आता याबद्दल आम्ही काही सांगायला नकोच. बाबा आमटे, साधनाताई आमटे यांच्यापासून सुरु केलेले व्रत प्रकाशकाका, मंदाताई यांच्यासह तुमच्या आमच्या पिढीचे अनिकेतदादा पुढे चालवत आहेत. हर्क्युलसला पृथ्वी तोलताना कमी कष्ट झाले असतील, एवढ्या अडचणी या मंडळी आदिवासी जनतेच्या पुनुरुत्थानासाठी सोसत आहेत. त्यांची ध्येयासक्ती अमर्यादित आहे. त्याच प्रेरणेतून साकार झालेला लोकबिरादरी प्रकल्प. आदिवासी जनतेसाठी दवाखाना, शाळा, वन्य प्राणी अनाथालय असे अनेक लोकोपयोगी उपक्रम या परिवाराच्या पुढाकाराने सुरु केले आहेत.

त्यातलाच एक म्हणजे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शाळा. प्रकाशकाका आणि मंदाकाकींची मुलंही याच शाळेत आदिवासी मुलांसोबतच शिकली. या शाळेला दरवर्षी होणारा (रिकरिंग) खर्च म्हणजे शाळेचे युनिफॉर्म्स. प्रत्यक्ष अनिकेत आमटेंचा त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून पाठवलेला आलेला हा इमेलच त्यांची गरज सांगून देतो.

नमस्कार
इमेल बद्दल आभारी आहे .
रंग महत्वाचे नाहीत. उत्तम दर्जाचे व टिकावू नवीन कपडे हवेत.
२ ते २० वयोगटातील प्रत्येकी २० ड्रेस हवेत.

आता आपण वेगवेगळे पाठवणे म्हणजे वेगवेगळे रंग आणि मापं, शिवाय थोडे महागही पडणार. म्हणूनच आमच्या ब्लॉगर्स मित्रांनी मिळून एकत्र काही तरी करायचे ठरवले आहे. प्रत्येक वयोगटासाठी २०-२५ जोड याप्रमाणे इयत्ता १ली ते १०वी पर्यंतच्या मुलांसाठी कपडे पाठवण्याचे ठरवले आहे. त्यासाठी येणार्‍या खर्चाचा तक्ता खालीलप्रमाणे आहे.

Screen area1-001

Screen area2-001

आपल्याला काय करता येईल?

आमच्या प्रामाणिक हेतूबद्दल खात्री असेल तर आपला खारीचा वाटा उचलता येईलच. अर्थातच हिशोबात पूर्णपणे पारदर्शकता असणारच आहे.  आपली एकत्रित मदत हेमलकसाला पोचली की सगळा हिशोब ईमेलवर मिळेल. आपली मदतीची इच्छा असेल तर कृपया या लिंकवर जाऊन आपले डिटेल्स भरा.


https://docs.google.com/forms/d/1uk0BrxZC2TqWIF9kJUrs2H3UcTNMoIQj2zPW4cQg_cc/viewform

आपणांस हवी असेल तर आपण डायरेक्टली त्यांनाही आपली मदत पाठवू शकता. परंतु थेंबाथेंबाने पोचणार्‍या मदतीपेक्षा तेच थेंब एकत्र करुन किमान घोटभर का होईना आपण मदत पोचवू शकू ना? म्हणूनच हा प्रपंच !

टीप: आपण वस्तुरुपाने मदत पाठवत असल्याने आयकरात सवलत मिळेल अशी पावती मिळणे शक्य आहे असे मला वाटत नाही. तसा टॅक्स बेनेफिट हवा असेल तर थेट लोकबिरादरीच्या साईटवर डिटेल्स आहेत तिथे मदत पाठवावी. त्याचाही लोकबिरादरीला फायदाच होईल.


http://lokbiradariprakalp.org/getting-involved/donate/

- सुझे

साभार  - पंकज झरेकर

मुक्ताजोबा…

आज मिपावर नीलकांतचा लेख वाचला (माझे आजोबा – एक आठवण) आणि न राहवून हा लेख इथे प्रसिद्ध करत आहे. लेख जिने लिहिलाय ती माझी शाळेतली मैत्रीण, हल्लीच परत नव्याने सापडलेली. तिच्या परवानगीनेच तिचे खरे नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर, हा लेख इथे प्रसिद्ध करतोय. त्यामुळे कॉपीराईटची समस्या होणार नाही याची खात्री बाळगावी.

सांगायचा मुद्दा एकच, मला स्वतःला माझ्या आजी-आजोबांचा सहवास फारसा जवळून लाभला नाही आणि लाभणार पण नाही कारण ते आता हयात नाहीत :( ते तिथे गावी असायचे आणि मी इथे शहरात. आज तरुणपणी त्याची प्रकर्षाने जाणीव होतेय. खरे सांगायचे तर ह्याक्षणी खूप खूप आठवण येतेय त्यांची. नीलकांतच्या लेखात असलेल्या आजोबांचा फोटो, अगदी माझ्या आजोबांसारखाच….तो पाहून नकळत भरून आलं. त्यांचे माझ्याजवळ नसण्याने किंवा मी त्यांच्याजवळ नसल्याने, आयुष्यात काय गमावले आहे ह्याचा हिशोब मांडणे कठीण. एका नातवाच्या आणि नातीच्या ह्या लेखातून, त्यांनी जसे सरळ सोप्या शब्दात त्यांचे प्रेम, आठवणी आणि भावना व्यक्त केल्या तसे मला आजन्म शक्य नाही :( :(

——————————————————————————————————————-

आज पहिल्यांदाच खूप रडू आलं तिला…अगदी ढसाढसा तिच्या आजोबांसाठी. आज तिच्या आजोबांची सर्व कार्य उरकलेली होती..शेवटचे अंत्यविधी..आज बारावं पूर्ण झालं होतं. घरातले इतर सगळेच आज बरेच शांत होते.. पण तिला – मुक्ताला अगदीच आवरत नव्हतं काही केल्या. तिची लहान भावंड, घरचे पहिल्यांदा तिला असं रडताना बघत होते.. आजोंसाठी. पण तिला कोणीही थांबवत नव्हत कारण गेल्या दोन-अडीच वर्षात ती एकदाही रडली नव्हती, ते गेले त्यादिवशीही नाही.. त्यांच्या आजारपणातही नाही.

खूप लोकं आली होती त्यांच्या अंत्यविधीला आणि आज बाराव्यालाही.. आजोबा होतेच तिचे तसे खूप माणस जोडून ठेवलेले..कोकणातल्या गावच्या भावकी पासून मुंबईतले जूने शेजारी, आजच्या राहत्या घरातले शेजारी, मुली-जावई, मुल, नातवंड, खूप जण. आजोबा तर ते मुंबई पोलीस खात्यातले चाकरमानी, पण माणसांची आवड असलेले प्रेमळ.. लोक आपापसात बरंच काहीकाही बोलत होती.. सुटले एकदाचे या आजारपणापासून.. नाहीतरी खूप त्रासात होते, शेवटी खूप हाल झाले त्यांचे .. तीच्या आजीला.. आईला, मावश्यांना.. मामांना शब्दांनी धीर देण्याचा प्रयत्न करत होते. नाहीतरी तुम्ही सगळ्यांनी खूप केलं त्यांच, ते समाधानात गेले असतील.. ती फक्त शांतपणे ऐकत होती..बघत होती हे सगळं. सारखं रडून आणि विचार करून करून तीच डोकं सुन्न झालं होतं. तिला कळतंच नव्हतं की, काय खरंच माझे आजो समाधानी होवून गेले असतील.. की समाधान म्हणजे काय हे ही त्यांना आठवत असेल त्यावेळी ??

रडून-रडून तिचे डोळे पार सुजले होते.. खूप थकली होती ती, त्यारात्री तरी तिला झोप काही केल्या येत नव्हती.. ती तशीच अंधारात त्यांच्या घरच्या खिडकीपाशी बसून होती.. बाहेर बघत.. हळूहळू सारं काही आठवू लागल तिला.. बाबांनंतर तिच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा पुरुष.. तिचे आजो. तिने कधीच गमावले होते, पण त्यांच्या सगळ्या आठवणी हळूहळू तिच्या समोर येत होत्या..जशी रात्र गहिरी होत चालली होती, तिच्या मनातले तिचे आजो..त्यांच्या आठवणीही तश्याच एकेक डोळ्यांसमोर तिला दिसत होत्या .. तिची तंद्री हळूहळू खूप खोल होत चालली होती.. असं वाटत होतं की तिच्या समोरच सगळ काही घडतंय.. मनी दिसणारे प्रसंग प्रत्यक्ष अनुभवतेय.

समोर दिसणारं चांदणं आणि चंद्र बघून, तिला ते खूप गोड दिवस आठवले… किती मर्यादित दिसतं हे आकाश छोटूसं. मोकळं आकाश अनुभवायला मुंबईतली कुठली जागा आहे याचा मुक्ता नेहमी शोध घ्यायची, पण फार कमीवेळा तिला मनापासून असं काही अनुभवायला मिळायचं. पण तेंव्हा … तेंव्हा तर ती झोपायची मोकळ्या आकाशाखाली तिच्या आजोबांच्या कुशीत…खूप लहान असताना ती दर उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी रहायला जायची.. दादरच्या पोलीस क्वाटर्समध्ये. तेंव्हा तिच्या आजोबांना काहीच वर्ष होती निवृत्त व्हायला.. त्यांच्या बिल्डींग आणि कॉलनीच्या जवळच एक खूप मोठ मैदान होत. उन्हाळ्यात त्यांच्या पोलीस कॉलनीत अशी पुरुष मंडळी मैदानावर झोपायला जाणं फारच साहजिक होतं. चटई, उश्या, चादरी घेऊन, तिच्या सवंगड्यांसोबत ती अशी बऱ्याचदा मोकळ्या मैदानावर झोपायला जायची..भीती, हुरहूर, आजच्या भाषेतली इनसिक्युरिटी, हे काहीच नसायचं त्यावेळी.. आजो आणि इतर खूप मंडळी बरोबर असायची.

गडद निळसर – कधी गडद काळ दिसणारं आकाश लांब-लांब पर्यंत पसरलेलं.. त्यावर चमचमणारे टिंब.. चांदण्या तारे की काय म्हणतात ते…चंद्र.. मधूनच जाणारं एखाद विमान.. मध्ये मध्ये लुडबुड करणारे ढग.. फार राग यायचा तिला या ढगांचा तेंव्हा. तिच्या आणि तिच्या मित्रमैत्रिणींच्या या आवडत्या खेळात, फक्त हे ढग व्यत्यय आणायचे.. आणि ही पडल्यापडल्याच हाताने त्यांना बाजूला व्हायचे हातवारे करायची, अगदी ट्राफिक पोलीस करतात तसंच.. आणि अगदी त्याचवेळी जर एखादा ढग खरंच बाजूला झाला, तर तिला वाटायचं की खरंच तिचं ऐकलं ढगांनी…किती तो आनंद.. मुक्ता आताही तशीच हसली, जशी त्यावेळी हसत सुटायची.. ह्या खेळात कधी झोप लागायची तिला कळायचंच नाही .. सकाळी जेंव्हा ती उठायची, तेंव्हा ती घरी असायची अंथरुणावर आणि खूप साऱ्या चादरी गोधड्या तिच्या अंगावर असायच्या…

आजी नेहमी प्रमाणे आत किचनमध्ये सकाळच्या न्याहारीच्या तयारीत व्यस्त असायची. सगळे आपापलं आवरत असायचे आणि तिचे आजो… सकाळची सारी आन्हिक उरकून.. अंगाला अगरबत्तीच्या उदीने, कुंकवाने भस्माप्रमाणे ठसे उठवून त्यांची देवपूजा चालू असायची.. हातात टाळ आणि त्यांची नेहमीची काही अर्धी-अर्धी भजनं मोठ्या खणखणीत आवाजात. त्यांची देवपूजा झाल्या झाल्या आजी त्यांना सकाळची न्याहारी दयायची.. आणि बऱ्याचदा एक टोलाही, करून करून भागले आणि देवपूजेला लागले.. मुक्ताने ऐकलं होतं की, खूप आधी ते दारू प्यायचे आणि कधी कधी आजीला त्रासही द्यायचे…. पण एकदा त्यांनी जी दारू सोडली त्यानंतर कधीच शिवली नाही. पण जे काही असेल आजीला मुक्ताने नेहमी त्यांची सेवा करताना त्यांच्यावर निरपेक्ष प्रेम केलेलं बघितलं आणि त्याचंही खूप प्रेम होतं तिच्यावर फक्त त्यांची ते व्यक्त करायची पद्धत वेगळी होती.. आजीशिवाय त्याचं खऱ्याअर्थाने पानही हलत नसे. मुली आणि जावयांवर नितांत प्रेम करणारे काळजी वाहणारे मुक्ताचे आजो.. फारच चपळ आणि बुद्धीने खरच तल्लख होते.

उंचपुरे शिडशिडीत बांधा, पण अगदी मजबूत, काटक, गहूवर्णी – उजळ पण नितळ कांती. घरी असताना पट्यापट्याची अर्धी विजार आणि गंजी.. बाहेर जाताना त्यावरच चढवलेली प्यांट आणि शर्ट. पण शर्टच्या बाह्या नेहमी दुमडलेल्या असायच्या कोपरापर्यंत. आणि केसांवर नेहमी थापलेलं तेल, डोक्याला गंधाचा लहानसा टीळा..असा अवतार असायचा त्यांचा. सर्वार्थाने मध्यम वर्गीय, मुळचा कोकणस्थ आणि मुंबईचा पोलिस..

प्रचंड मेहनती आणि अतिथी देवो भव हा नियम आयुष्यभर जगणारे. तिचे आजो खूपच आग्रही होते खाण्यापिण्याच्या बाबतीत, सगळ्यांसाठीच. त्यांच्या खाण्यापिण्याच्या, झोपण्या-उठण्याच्या वेळा ठरलेल्या असायच्या. तिने कधीही त्यांना आजारी पडलेल बघितलं नव्हतं. त्यांना एकच त्रास; कधी झाली तर सर्दी आणि खूप फिरल्यावर दुखणारे पाय. मुलीची लग्न उरकून पेन्शनवर घर चालवणारे तिचे आजोबा तितकेच स्वाभिमानी. आजो जितके प्रेमळ तितकेच कणखर आणि हट्टी होते. निवृत्त झाल्यानंतर मुंबईतल्या उपनगरात राहायला आले होते. घरात ते इतर कुणाचच ऐकायचे नाही फक्त ती आणि मुक्ताचे आई-बाबा आजोंच मतपरिवर्तन करू शकत होते. मुख्य सल्ल्यांसाठी त्यांना फक्त मोठी नात आणि जावईच चालायचे.

अगदी पुलंच्या अंतू बर्व्या सारखे.. अस्सल कोकणस्थ.. कोकणातल्या फणसाप्रमाणे बाहेरून काटेरी-कडक पण आतून तितकेच मऊ-मधाळ.. खूप पिकल्यावरच गोडवा येणारे. किनाऱ्यावर असलेल्या वाळूसारखेच दिवसा जितकी तापेल, रात्री तितकीच थंड पडणारी… थंड वाळूचा स्पर्श, किनाऱ्यावरचा गारवा आठवून तिला भान आले की, अचानक खूपच गार वाऱ्याची झुळूक मुक्ताला स्पर्शून गेली पण या थंडाव्याने अचानक तिला थेट त्या खोलीतला गोठवणारा गारवा आठवला..

त्यादिवशी डॉक्टरांनी शेवटी मुक्ताला आत बोलावून घेतले. त्या दिवशी आजोंचं एमआरआय, सिटी स्कॅन करायचं होतं. ते झोपायला तयारच नव्हते. ती मशीन आत गेली की, हे तिथे उठायचा प्रयत्न करायचे आणि डोकं आपटून घ्यायचे. अश्याने डॉक्टरांना काम करणं शक्य नव्हतं, म्हणून त्यांनी शेवटी मुक्तालाच आत बोलावले. ती जशी आत आली, तसे आजो उठून तिथेच बसले. हल्ली त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बऱ्याचदा असेच असायचे, एखाद्या लहान मुलासारखे. डोळ्यात अगदी निरागसता, कधी कधी टोकाचा राग, आश्चर्य, असुरक्षितता, गोंधळलेले. आत्ता तर ते मुक्ताकडे जत्रेत हरवलेल्या मुलासारखेच बघत होते. मुक्ता शांतपणे हसत त्यांना समजावू लागली की, “आजो तुम्हाला बरं नाही, म्हणून आपण ही टेस्ट करतोय फक्त थोडावेळच झोपून राहा डोळे बंद करा मी इथेच उभी आहे..” तसे ते झोपले. तिने त्यांची चादर आणि कान बंद करायचं यंत्र नीट केलं. एका हाताने त्यांचा हात पकडलेला आणि एका हाताने त्यांच्या दोन्ही पायांवर तिचा हात ठेवलेला. डॉक्टर्स आणि टेकनिशीअन्स काचेतून हे बघत होते. आजो गप्प पडून राहिले आणि मुक्ता हळू आवाजात त्यांच्याशी काहीतरी बोलत राहिली, त्यांना खात्री पटण्यास की ती तिथे आहे. तिने काचेतून डॉक्टरांकडे बघून अंगठा उंचावून इशाऱ्याने टेस्ट पूर्ण करण्यास सांगितले. त्या बंद खोलीत प्रचंड थंडी आणि मशीनचा खूप जास्त आवाज होता. मधून मधून “झालं का??… झालं का??” असं ते विचारत होते पण मुक्ताने “थोडाच वेळ अजून” असं सांगितलं की, पुन्हा गप्पं पडून राहात. मधूनच येणारा कर्कश्श मशीनचा आवाज आणि एसीमुळे वाजणारी थंडी, याने तिला उभं राहणं खूप कठीण होत होतं. अखेर टेस्ट पूर्ण झाली. टेस्ट चे निकाल दुसऱ्या दिवशी कळणार होते.

अपेक्षेप्रमाणेच निकाल तेच आले जे डॉक्टरांनी वर्तवले होते. तिच्या अजोंना ‘अल्झायमर्स’ .. ‘स्मृतीभ्रंश’ झालेला. तिने स्वतः रिपोर्ट्स बघितले आणि विज्ञान शाखेची विद्यार्थी असल्याने, तिला बऱ्यापैकी समजतही होतं. The grey and some of the white matter had started decaying.. त्यांच्या मेंदूच्या पेशी कमी होत चाललेल्या दिसू शकत होत्या तिला हातातल्या रेपोर्टस प्रमाणे.

डॉक्टर कुलकर्णी, मुंबईतले प्रसिद्ध न्युरोलोजीस्ट तिला आणि तिच्या मामाला समजावत होते, तूला माहित असेलच हा आजार कधीच बरा नाही होत. अजूनही no medical research has been successful to recover this.. तू फारच हुशार आणि जबाबदार आहेस. तू ह्यांना पहिल्यांदा इथे घेऊन आलीस त्या विजिट पासूनच ओळखलं मी. मुक्ता शांतपणे ऐकत होती. डॉक्टर तिला सांगत होते, “बघ आता घरच्यांना तूच समजवायचं आहेस तुझ्या पद्धतीने. आपण आजाराची गती फक्त कमी करू शकतो, पण अश्या पेशंट्सना पूर्ण बरं नाही करू शकत. मी काही औषधं लिहून देतोय, ती नियमित चालू ठेवा आणि दर दोन महिन्यांनी यांना चेकअपला आणत जा. यांना जमेल तितकं समजावून घ्या. हळूहळू ते बरंच काही काही विसरू लागतील आणि त्यामुळे सतत ह्यांच्या बरोबर कोणीतरी रहायला हवं “

मुक्ताने डॉक्टरांना सांगितल की, या बाबतीत काही चिंता नाही. आज्जी घरी असते, मामाही आहेच आणि आमचं कुटुंब आहे मोठा आधार. तिचे आजोबा त्या दोघांच्या बोलण्याकडे बघत होते आणि त्यांनी डॉक्टरांकडे बघून हसत हसत विचारलं… “काय गो बाय.. काय बोलताहेत हे?” डॉक्टर म्हणाले, “ती सांगेल हो तुम्हाला नंतर..” डॉक्टरांचे मनापासून आभार मानून ती कॅबिनबाहेर पडली. आजोंचा हात धरता-धरता आणि कॅबिनबाहेर वळतावळताच तिने काही सेकांदासाठीच डोळे बंद केले आणि एक खूप दिर्घ श्वास घेतला… जणू काही तिला सारी शक्ती, सहनशीलता एकवटायची होती. आजोंना पुढच्या प्रवासात साथ देण्यासाठी.

मुक्ता खूप लाडकी होती घरात सगळ्यांचीच. त्यांच्या घरातली सगळ्यात मोठ अपत्य तिसऱ्या पिढीतली. तिच्यावर जितका घरातल्या सगळ्यांचा जीव, त्याच्या कितीतरी पटीने तिचा इतर सगळ्यांवर.. जितक्या लाडात मुक्ता वाढली तितक्याच जबाबदाऱ्या मोठी म्हणून तिच्या अंगावर पडत असे आणि तीही सर्व सांभाळून आनंदाने कुणाचीही काम पार पाडत असे. तिच्या मावस चुलत भावंडांची शिक्षणाची वाटचाल, कॉलेज प्रवेश, हॉस्पिटल्स, डॉक्टर्स, या सगळ्याची खूप सवय झालेली तिला..मुख्यतः घराबाहेरची कामे करण्यात तिला खूप गती असायची.. मुळातच ती ठाई-ठाई उर्जेने परिपूर्ण, इंग्रजीत smart आणि dashing म्हणतात तशीच. उत्तम संवाद कौशल्य असलेली. नावाप्रमाणेच मुक्त… आचारात आणि विचारातही. पण तितकीच हळवी …

गेले खूप दिवस, काही महिने तिच्या अज्जोंमध्ये बराच फरक जाणवत होता… गोष्टी विसरू लागले होते ते. घरातले सगळेच याचं निरीक्षण करायचे, विशेषतः आजी. एक दोनदा आजीने मुक्ताला आणि तिच्या आईला बोलूनही दाखवलेलं की, हल्ली मला यांच काही नीट नाही वाटत, कधीकधी विचित्रच वागतात. कुठे बाहेर पाठवायलाही भीती वाटते. एकदोनदा ते असेच आजीचा डोळा चुकवून घराबाहेर पडले फिरायला आणि हरवले होते. खरंच त्यांच बाहेर पडणं खूप कमी आणि नंतर नंतर बंदच झालेलं तेंव्हापासूनच त्यांचा डॉक्टर ठरवण्यापासून त्यांच्या आजारपणाची जबाबदारी नकळत मुक्ताकडे आली होती .. कदाचित तीच पात्र होती त्यासाठी.

पहिल्या विजीटला डॉक्टरांनी काही साधे साधेच प्रश्न विचारले आजोंना. तुमचं पूर्ण नाव काय? तुमचं वय? तुम्ही कुठे राहता? हे हॉस्पिटल कुठल्या स्टेशन पासून जवळ आहे? ही तुमची कोण आहे? तुमच्या पत्नीच नाव काय? तुम्हाला किती मूल आहेत? तुमचा पाय कुठेय? तुमचा उजवा हात कुठला? डावा कान कुठेय? तुम्हाला किती डोळे आहेत? आता किती वाजलेत? काही प्रश्नाची उत्तरं ते अगदी बरोबर देत होते, पण काही प्रश्नांना अगदी अडखळत होते. तोंडी परीक्षेत उत्तर देता नाही आलं की, लहान मूल कशी चळवळ करतात, नाहीतर उत्तरांची सारवासारव करतात, नाहीतर एकदम शांत बसतात. हे पण काहीसं तसेच करायचे. डॉक्टरांनी शंका व्यक्त केली होतीच, तरीही खात्रीसाठी सर्व चाचण्या परत करण्यास सांगितले गेले होते.

ज्या दिवशी हे शिक्कामोर्तब झालं की, यापुढे आपल्या कुटुंबाला कशाला तोंड द्यायचंय आणि आज्जोंची कश्याप्रकारे काळजी घ्यावी लागणार आहे, त्या क्षणापासून तिने ठरवलेलं की, कधीच रडायचं नाही आणि हताश-निराश होणं तर नाहीच नाही. घरी येऊन तिने जेंव्हा आईला सांगितलं, तेंव्हा आयुष्यात पहिल्यांदा स्वतःच्या आईला अस रडताना अश्रू ढाळताना बघितलं होतं. ती समजू शकत होती स्वतःच्या वडिलांना अस ढासळताना बघणं, तिच्यासाठी किती वेदनादायी असू शकेल. मुक्ताने हळूहळू घरातल्या सगळ्यांनाच याची स्पष्ट कल्पना दिली होती की, आजोंची जी परिस्थिती आता आहे, उद्या त्यापेक्षा जास्त गंभीर होईल…परवा त्याहीपेक्षा जास्त..

पण परिस्थितीला तोंड देण्यास खंबीरपणे मनाची तयारी करणे आणि ती तयारी प्रत्यक्ष आजमावणे यात काय फरक होता हा अनुभव तिला पुढच्या दिड वर्षात आला… डॉक्टरच्या प्रत्येक विजिटसाठी ऑफिसला सुट्टी घेवून ती कधी मामाबरोबर, कधी मावशी, कधी स्वतः एकटीच आजोंना घेवून जायची. डॉक्टर कुलकर्णी अर्थातच उत्तम डॉक्टर, पण त्याहीपेक्षा खूप समजूतदार संवेदनशील माणूस. त्यांच्या बोलण्यात एक वेगळीच स्थिरता, गारवा जाणवायचा. मुक्ताला आयुष्यभर लक्षात रहाणार होतं हे व्यक्तिमत्व..

आजोंच्या आजाराची हळूहळू ‘प्रगती’ होत होती. त्यांना हळूहळू वेळ .. वार .. दिवस .. भौगोलिक जागा ह्याचं भान राहत नव्हतं. विसरत चालले होते ते हळूहळू सगळंच. पण आज्जीचे हाल मुक्ताला बघवायचे नाही. आजोंपाठी खूप दमछाक व्हायची तिची. अधून मधून मुक्ताच्या घरी रहायला यायचे आजो. तेंव्हा तिच्या आईबरोबरच तीही सारं काही करायची आजोंच. अगदी त्यांना आंघोळ घालण्यापासून त्यांचे कपडे बदलणे, त्यांच्याकडून नाश्ता करवून घेणे, त्यांना फिरायला नेणे. आजो असल्यावर ती आणि तिचा लहान भाऊ रात्री जागेच राहत त्यांच्यावर लक्ष ठेवायला. कारण हल्लीतर त्यांना दिवस रात्रही कळायची नाही. कधी उठावं कधी झोपावं.. रात्री अंधारात मधेच उठून किचनमध्ये, खिडक्यांजवळ धडपडत जायचे.. झोप.. भूक.. आराम.. थकवा या सगळ्याचीच माहिती पुरवण्यात त्यांचा मेंदू असमर्थ ठरत होता. दिवसेंदिवस माणसेही विसरत चालले होते ते. जेवता- जेवता मध्येच तसेच बसून रहायचे..विसरून जायचे की ते जेवताहेत. कधीकधी कसं खायचं हेच विसरायचे, पण परिस्थिती अगदीच दयनीय वाटू लागली, जेंव्हा मूलभूत उत्सर्जन क्रियांवरही त्यांच स्वतःवरच नियंत्रण, भान ते हरवून बसले. त्यांना डायपर्स वापरण्याची वेळ आली.

अस म्हणतात की म्हातारपण, म्हणजे पुन्हा प्रौढत्वाकडून बालपणाकडे चालू झालेला उलटा प्रवास. पण मुक्ता आणि तिचे घरचे आजोंच्या रूपात हे प्रत्यक्ष अनुभवत होते. आईला तिन्ही जगाचा स्वामी का म्हणतात हे आपण तेंव्हाच चांगल जाणू शकतो, जेंव्हा आपण स्वतः कोणाची तरी आई होऊन जगतो.

आजोंचा तिला कधीच कंटाळा नाही आला.. कधी दया नाही आली, पण सगळ्यात जास्त वाईट तेंव्हा वाटायचं, जेंव्हा ती आजोंचा स्वतःचा स्वतः बरोबर चालंलेला संघर्ष बघायची. त्याना आधी आधी कळायचं की, माझ्याबरोबर काहीतरी विचित्र होतंय पण नेमकं काय ते कळायचं.. सापडायचं नाही. एखादी चूक झाल्यावर माझ्याकडून असं का झालं, यावरून ते स्वतःवरच नाराज होवून बसायचे. माणसाच स्वत:वरचं नियंत्रण गमावून बसणे, तेही एका शारीरिक व्याधीमुळे.. काही पेशी निकामी झाल्यामुळे .. हे बघणं मुक्ताला फार असह्य व्हायचे.

लहानपणापासून मुक्ताला सगळे बॉर्न फायटर म्हणायचे; मजेत चिडवायचे ‘भांडखोर’ म्हणून. ती कधीच हताश होणाऱ्यांपैकी नव्हती. प्रत्येक समस्येवर काहीतरी उपाय, तोडगा असतोच आणि आपल नशीब आपण आपल्या कर्मांनी घडवतो या स्पष्ट विचारांची. पण आजोंच्या बाबतीत ती काहीच करू शकत नव्हती. तिने इंटरनेटवर अल्झायमर विषयी खूप माहिती गोळा केली.. काही इतर डॉक्टरांचे सेकंड ओपिनियन घेतले होते.. मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांच्याशी चर्चा करून खूप विचार करून, तर्क लढवून पुस्तके धुंडाळून बघितली. काहीतरी मार्ग असावा या प्रयत्नात होती. खूप राग यायचा तिला या परिस्थितीचा.. नशिबाचा. यासाठी नाही की ही वेळ आलीय, पण यासाठी की ती काहीच करू शकत नाहीये. कुठलेही कितीही प्रयत्न केले, तरी ते फुकट जाणार होते

असहाय्यता.. टोकाची असहाय्यता. बौद्धिक, शारीरिक, मानसिक, भावनिक, आर्थिक सर्व प्रकारची कुवत असूनही येणारी असहाय्यता, निष्क्रीयता. हे एकच सगळ्यात मोठ दुखः होत. Knowledge is power .. Knowledge centric .. rationalist .. प्रयत्नवादी मुक्त यावेळी नशीब, आपल्यावर असणार इतर कुठल्यातरी मोठ्या शक्तीचं वर्चस्व, यावरही विचार करू लागली होती. पण काय फायदा?

प्रत्येक परिस्थिती नेहमी झगडण्यासाठी किंवा सामना करण्यासाठी येत नसते आयुष्यात… काही वेळा, काही अनुभव, काही परिस्थिती, काही गोष्टी जश्याच्या तश्या मान्य कराव्या लागतात. हूशारीने, हसतमुखाने, असहाय्यपणे, शांतपणे किंवा तटस्थपणे कशाही…पण मान्य कराव्या लागतात जश्याच्या तश्याच बस्स.

तिनेही ते मान्य केल होतं. पुढच्या काही दिवसांत आजोंची तब्येत अजून खालावत गेली. शरीराने ते खूप कृश होत चालले होते. प्रचंड कफ झाल्याने.. किंवा तत्सम काही कारणाने त्यांना एकदोनदा हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलेलं, पण जेंव्हापासून त्याना पहिल्यांदा हॉस्पिटलमध्ये नेलं तेंव्हापासून ते खूपच आक्रस्ताळे, आदळआपट करणारे झालेले. खूप टोकाची चिडचिड करायचे. म्हणायचे काय तुम्ही मला मारायला आणलात इथे? हे वाक्य ऐकून मुक्ता आणि इतरांना काय वाटायचं हे त्याचं त्यांनाच माहित. काय करणार या आधी हा त्र्याऐंशी वर्षांचा म्हातारा हॉस्पिटलची पायरी फक्त आणि फक्त इतरांसाठी चढलेला हे कोणालाच सांगितलं तर खरं वाटायच नाही. मोतीबिंदुची शस्त्रक्रिया सोडली, तर त्यांना कधीही हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं नव्हतं.

हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये नर्सेस, वॉर्डबॉय यांच्याशी ते वाद घालायचे. बऱ्याचदा त्यांचे हात बांधून ठेवावे लागायचे बेडच्या कडांशी. एकदोनदा मुक्ताने स्वतः त्यांच्या नकळत त्यांचे हात बांधले होते…नाहीतर त्यांना इंजेक्शन, औषध देणं अशक्य होतं. ते खूप गाढ झोपेत असले की, त्यांचे बांधलेले हात सैलसर सोडवताना मुक्ताच्या डोळ्यांच्या कडा पूर्ण भरून यायच्या…पण ती कधीच वाहू द्यायची नाही. गळा दाटून यायचा .. रडणं म्हणजे तिला कमजोरपणाच लक्षण वाटायचं. स्वतःवरच नियंत्रण खूप महत्वाच होत तिच्यासाठी निदान आजोंच्या बाबतीत…

…. ते गेले त्या दिवशी ती सुन्न होवून बघत होती टक लावून त्यांच्या डोळ्यांत. त्यांच्या पापण्या बंदच होत नव्हत्या. पहिल्यांदा एखादा मृतदेह ती इतक्या जवळून बघत होती. जीवनज्योत… प्राण.. हे डोळ्यातच सामावलेलं असतं असं म्हणतात. जिवंत आणि मृत व्यक्तीच्या डोळ्यांत नेमका काय फरक असतो, हे अगदी स्पष्ट दिसत होत तिला… आजोंच्या डोळ्यात खोल काहीतरी शोधताना. तिला तिच्या मामाने हळूच बाजूला सारून स्वतःच्या मिठीत घेतले आणि अलगदच आजोंचे डोळे बंद केले.

आणि इथे दिवस उजाडत असतानाही मुक्ताचे डोळे मात्र सताड उघडे होते..पक्ष्यांचा चिवचिवाट, हवेतला कमी होत चाललेला गारवा, थोडासा प्रकाश यांच्या जाणीवेने ती भानावर आली. खिडकीच्या कडांना इतका वेळ टेकून राहिल्याचे, गहिरे वळ तिच्या हातांवर पडले होते. पूर्ण शरीर आखडल्याची जाणीव झाल्याने, ती उठून उभी राहिली. त्यावेळी तिची मनस्थिती नेमकी कशी होती.. तिला नक्की काय वाटत होत दुःखी, शांत, विषण्ण भावनाशून्य हे तिलाच ठावूक नव्हत.

तिने सहजच खिडकीतून खाली वाकून बघितलं. त्यांच्याच बिल्डींग मध्ये रहाणारी छोटीशी काही महिन्यांची परी.. तिच्या चळवळण्याचा, बोबड्या बोलांचा आवाज येत होता.. सकाळी परीची आई कामावर जायच्यावेळी तिचे आजोबा तिला असेच नेहमीच्या सवयीप्रमाणे बाहेर फिरवायचे… तेही पट्यापट्यानचा लांब लेंगा किंवा प्यांट आणि तशीच आजोंसारखी बाह्यांची गंजी घालायचे… परीला त्यांच्या कडेवर खेळताना बागडताना बघून मुक्ता रडत सुटली. स्वतःच्याच ओंजळीत चेहरा खूपसून… स्वतःवरच सर्व नियंत्रण विसरून….

~ मुक्ता

———————————————————————————

- सुझे !!

ये साली जिंदगी….

ऑफिसच्या मिटिंग रूममध्ये तो एकटाच बसून होता. एसीची सौम्य घरघर आणि हातातल्या पेनाची टेबलावरची टकटक ती भयाण शांतता भंग करत होती. त्याच्या एका बाजूला पाण्याची बाटली, एक कॉम्प्युटर, दोन-तीन फाईल्स पडून होत्या. मध्येच ते पेन तोंडात धरून फाईल्सवर आणि कीबोर्डवर हात चालवत होता. काही आकडेमोड, फॉर्म्युले तो पुन्हा पुन्हा तपासून बघत होता. शेवटी काही चूक नाही हे तपासून ऑफिसच्या लेटरहेडवर त्याने एक प्रिंट काढलं. ते तसंच काही वेळ हातात धरून निरखून बघत राहिला आणि मग एका कोपर्‍यात त्याने सही केली. त्या पानावर ठळक अक्षरात विषय होता - “Performance Development Review For Year 2012″

काही मिनिटांनी त्याचाच एक मित्र केबिनमध्ये आला. त्याच्याशी हात मिळवत समोरच्या खुर्चीमध्ये बसला. नेहमी हे दोघे मित्र भेटल्यावर गळाभेट घेत असत, पण आज वातावरण वेगळे होते. दोघांच्याही वागण्यात एक तणाव होता. मित्राने त्याला विचारले, “कसा आहेस?” तेव्हा त्याने त्याचे नेहमीचे उत्तर दिले, “कट रही हैं साली जिंदगी” आणि स्वत:च हसायला लागला. कसा आहेस असे त्याला कोणी विचारल्यावर त्याचे हे ठरलेले उत्तर असायचे. मग थोडा वेळ दोघेही शांत झाले आणि मग न राहवून त्याने मित्रासमोर तो कागद धरला आणि नंतर पाच मिनिटे त्या मिटिंग रूममध्ये शांतता पसरली. त्याचा मित्र तो कागद वाचू लागला, नंतर तो तिथे ठेवलेले काही परफॉर्मन्स रिपोर्ट्स अधाशासारखे चाळू लागला. एक एक पान उलटून आपले नाव आणि त्यापुढे असलेले आकडे पुन्हा पुन्हा तपासून घेऊ लागला. त्याला हवे ते मिळत नव्हते. त्याचा संयम आता सुटू लागला, तो आपल्या मित्राकडे बघून काहीश्या रडवेल्या स्वरात म्हणाला, “मित्रा, काही करता नाही का रे येणार? तुला तर माहीत आहे, मी संसारी माणूस आणि मला दोन मुलंही आहेत. हे असं अचानक झाल्यावर मी कुठे जाणार? मला इतक्या पगाराची नोकरी बाहेर मिळणार नाही रे. मित्रासाठी काही तरी कर रे. विनंती करतो.”

त्याला हे काहीसे अपेक्षित होतेच, तो आपल्या जागेवरून उठला. त्या रूममध्ये फेर्‍या मारू लागला आणि तो मित्र त्याच्याकडे आशेने बघत राहिला. परफॉर्मन्स रिव्ह्यू ह्या गोंडस नावाखाली कंपनीने लोकांना कमी करायचे ठरवले. कंपनीच्या खर्चाचा ताळेबंद बघता त्यांना किमान २० टक्के लोकांना कमी करायचे होते आणि दोन लोकांना ह्या कामाची जबाबदारी दिली होती. गेल्या बारा महिन्यांचा कामाचा विदा जमा करून, यादीत सगळ्यात शेवटी नावं असणार्‍या लोकांच्या नोकरीवर गदा येणार होती. जेव्हापासून ह्या दोन जणांची निवड ह्या कामासाठी केली गेली, तेव्हापासून त्यांच्या मित्रांना हे दोघे यमदूतासारखे भासायला लागले. सगळे एकमेकांचे मित्र, पण एका मित्राला दुसर्‍या मित्राच्या नोकरीची सूत्रे हातात दिल्याने वातावरण एकदम तणावपूर्ण झाले होते. रोज २० जणांना कामाच्या आधी एक तास बोलावले जायचे आणि हे प्रेमपत्र देऊन त्यांची नोकरीवरून गच्छंती केली जायची. नावाला परदेशी कंपनी, पण साला नोकरीची शाश्वती नाहीच. आधी मोठे मोठे पगार देऊन लोकांना मोठ्या प्रमाणावर भरती करायचे आणि काम संपल्यावर त्यांना नोकरीवरून काढून एकाच्या पगारात दोघा-तिघांना संधी द्यायचे. त्यामुळे कंपनीला चिक्कार फायदा व्हायचा.

ह्याच कंपनीत नवीन नवीन नोकरी मिळाल्यावर त्याच मित्रांबरोबर घालवलेले ते आनंदी क्षण त्याच्या डोळ्यासमोर येत होते. आज त्याचाच एक मित्र त्याची नोकरी वाचवण्याची विनंती, त्याच्याच जिवाभावाच्या मित्राला करत होता. तो मनातल्या मनात विचार करू लागला, “साला काय काय करावं लागतंय मला नोकरीपायी. आज ह्या मित्राच्या डोळ्याने त्याची बायका-पोरं नोकरी न जाण्यासाठी विनवण्या करत आहेत. ह्या सणासुदीच्या काळात मित्राला नवीन नोकरी शोधत हिंडावे लागेल…. पण पण आकडेवारीनुसार परदेशातल्या मोठ्या मंडळींनी हा कार्यक्षम नसल्याचे कळवले आहे आणि त्यामुळे कंपनीला त्याची काहीही गरज नाही”

त्याला काही सुचत नव्हते. त्याला दिलेल्या टार्गेटचे हे शेवटचे दोन दिवस. त्याने जर स्वत:ची कार्यक्षमता सिद्ध केली नाही, तर त्याला नोकरीहून पायउतार व्हावे लागले असते. त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली. त्यात दुष्काळात तेरावं म्हणजे, त्याच्या बॉसने त्याची काल केलेली कानउघडणी. कानउघडणी म्हणण्यापेक्षा धमकी म्हणू शकतो त्याला. त्याच्या बॉसच्या केबिनमध्ये घालवलेले ते क्षण त्याला आठवू लागले. ह्या परफॉर्मन्स ऑडीटसाठी ज्या दोघांची निवड केली, त्यांना कंपनी डायरेक्टरने आपल्या केबिनमध्ये बोलावले. दोघेही अवघडून उभेच राहिले, पण बॉसने बसायला सांगितल्यावर अवघडून बसले.

बॉस बोलू लागला, “मला काही लोकांकडून कळले आहे की, तुम्ही तुमचे काम नीट करत नाही. तुमच्या मित्रांशी चर्चा करताना तुम्ही सांगता की, कंपनी बकवास आहे, इथून सुटताय हे बरंय. (त्या दोघांवर ओरडत) How dare you to say that?? तुमचे हे मैत्रिपूर्ण संदेश तुमच्याकडेच ठेवा. तुम्हाला तुमचा पगार व्यवस्थित मिळतोय ना? कधी त्यात एक दिवस उशीर झाला? नाही नं? मग… ज्या कंपनीने तुम्हाला नोकरी दिली तिच्याबद्दल तुम्ही मस्करीतसुद्धा अपशब्द काढताय….एक लक्षात ठेवा, लोकांना नोकरीवरून काढायला तुम्हाला हौसेने सांगितलं नाही. तुमचे-माझे पगार व्यवस्थित आणि वेळेवर व्हावे, त्यात एक रुपयाचीसुद्धा कमी होऊ नये म्हणून ही कठोर पावले उचलावी लागत आहेत. ही कंपनी माझ्या बापाची नाही, की मी इथे मनाला येईल ती कामे करेन. प्रत्येक गोष्टी करताना मलासुद्धा २०-२५ ईमेल्स पाठवाव्या लागतात. मी फक्त एका प्रोसेसचा डायरेक्टर आहे. असे अनेक डायरेक्टर ह्या कंपनीत आहेत, त्यामुळे एकाला कमी करायला त्यांना काही कष्ट पडणार नाहीत. तुम्हाला हे करायला सांगताना मला आनंद होतोय असं नाही, पण मलासुद्धा कोणीतरी बॉस आहे आणि तो जे सांगेल ते मला करावंच लागेल. नाही केलं तर त्यांना दुसरा कोणी मिळेल, मग आपणच का नाही स्वत:ला पर्याय व्हायचं? मी इथे मोठा विचारवंत बसलेला नाही, पण तुमच्यापेक्षा अनुभव जास्त आहे माझ्याकडे आणि खरं सांगायचं तर माझ्याकडे जो जबाबदारी आहे, त्यासाठी मला तुम्हा कोणालाही स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. मी जे सांगेन ते तुम्हाला मुकाट्याने करावेच लागेल, कारण मीसुद्धा तेच करतोय. जे मला माझ्या बॉसने सांगितलं, तेच तुम्हाला सांगतो – काम जमत असेल तर करा, नाही तर समोर दरवाजा आहे. तिथून चालते व्हा!!”

हे असे त्याला आजवर कोणी सुनावले नव्हते, पण काय करणार? परिस्थिती तशी आहे. सगळ्यांचे हात दगडाखाली आहेत. रिसेशन जे काय ते म्हणतात, ते काल्पनिकरीत्या सगळ्यांनी राबवायला सुरुवात केली होती. त्यामुळे कॉलेजमधून नुकतेच पास झालेले विद्यार्थ्यांना – जे अगदी कमी पगारात मिळेल ती नोकरी करायला तयार असतात, अश्यांना – नोकरी देऊन, अनुभवी लोकांच्या पगारात चार-पाच डोकी काम करू लागली. काम करणार्‍यांची संख्या वाढली, पण कार्यक्षमता हवी ती मिळाली नाही, कारण अनुभवाची कमतरता. मग परदेशातून एक ईमेल येणार, इतक्या लोकांची गरज ती काय? लोक कमी करा आणि खर्च आटोक्यात आणा आणि त्यासाठी सुरू होते परफॉर्मन्स ऑडीट. वास्तविक पाहता परफॉर्मन्स ऑडीट करणारा तो कोणी मोठा नव्हता. त्याचा स्वत:चा परफॉर्मन्स चांगला असल्याने कंपनीच्या डायरेक्टरने त्याची ही निवड केली होती. त्याला ते बिलकूल आवडले नव्हते आणि आपल्या मॅनेजरकडे त्याने तशी नाराजी व्यक्तही केली, पण त्याचे ऐकतेय कोण? त्याने तडकाफडकी आपला राजीनामा लिहिला आणि पाठवून दिला. त्याच्या कामाचे शेवटचे ६० दिवस तो मोजू लागला. आता मोजके १५ दिवस उरले आहेत त्याच्या कंपनीत. मग तो काहीतरी वेगळा पर्याय निवडण्यासाठी सिद्ध होत होता.

“अरे, काय झालं?” त्याच्या मित्राने त्याला हाक मारली. ती हाक ऐकून त्याची विचारांची तंद्री एकदम भंग पावली. काहीसा दचकल्यासारखा तो आपल्या मित्राकडे बघू लागला. विचारांच्या गर्तेत आपण किती काळ हरवलो होतो, ह्याचे त्याला भान नव्हतेच. तो नुसता फेर्‍या घालत होता. तो आपल्या जागेवर आला. त्याने मित्राच्या हातून तो पेपर घेतला. काही काळ तो तसाच बघू लागला त्या पेपरकडे, मग त्याने सहीखाली तारीख लिहिली आणि मित्राला म्हणाला, “माफ कर, मला जे जमेल ते नक्की करेन तुझ्यासाठी. तुला ३० दिवसांची मुदत देतोय. दरम्यानच्या काळात नोकरीचा शोध घेणे सुरू कर. मी तुला काही रेफरन्स देतो. तिथे जा, तुला अपेक्षेप्रमाणे पगार मिळेल. तुझा कंपनीतला शेवटचा दिवस २० नोव्हेंबर. कंपनी सोडताना तुला दोन महिन्यांचा पगार दिला जाईल. माझ्या परीने मी हेच करू शकतो. सॉरी यार…”

त्याचा मित्र काहीसा रागवत बाहेर पडला आणि इथे तो स्वत:ला दोष देत राहिला की आपण काय करतोय… पण मी काही चुकीचेही करत नाही. मला माझी नोकरीसुद्धा वाचवायची आहे. शेवटचे १५ दिवस असले तरी, इथे आपल्या कामावर कुठलाही काळा शिक्का बसू नये असे त्याला वाटत होते. जमेल तितक्या सहकार्‍यांना वाचवायचे त्याने प्रयत्न केले. पाणी नाकापर्यंत आलेले पाहून, माकडीणसुद्धा आपले पिल्लू आपल्या पायाखाली घेऊन भरलेल्या हौदात श्वास घेण्यासाठी मान वर काढते, तिथे तो काय चीज? विचार करत करत तो त्या केबिनबाहेर पडला. एव्हाना पहिली शिफ्ट कामावर आली होती आणि जोरदार काम सुरू होते. सगळे जण आपापल्या कामात व्यस्त होते. कोणी त्याला पाहून जागेवरून उठून त्याचे आभार मानले, हात मिळवला, तर कोणी नुसते तोंडावर हसून मनातल्या मनात त्याला प्रचंड शिव्या घातल्या.

त्याने त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले. त्याला कामात मन रमवायचे होते. तो सगळ्यांना मदत करू लागला. मघाशी ज्या मित्राला त्याने नोकरीवरून कमी केले, त्याला घेऊन चहा प्यायला गेला आणि तोही त्याच्यासोबत न बोलता निघाला. त्याला आपली परिस्थिती कळली, ह्याचे समाधान त्याच्या चेहर्‍यावर होते. ब्रेकमध्ये त्याने स्वत: दुसर्‍या कंपनीमध्ये फोन करून त्याच्यासाठी इंटरव्ह्यू ठरवून दिले. कुठल्यातरी पापाचे क्षालन करण्याची त्याची अनामिक धडपड सुरू होती; जरी ते पाप नसले, तरी त्याच्या जिव्हारी खोलवर ते कुठेतरी लागलेले होते. त्याची ही धडपड बघून त्याचा मित्र मनोमन सुखावला आणि त्यांनी एकमेकांची गळाभेट घेतली आणि एकमेकांना मैत्रिपूर्ण शिव्या घालत “काम कर” म्हणून सांगत आपापल्या डेस्कवर जाऊन बसले..

त्याच रात्री त्याच्या बॉसने त्याला प्रमोशन देऊन दुसर्‍या. एका अकाऊंटमध्ये टीम लीडरची बढती दिली. त्याला हे अनेपेक्षित होते. त्याला उगाच अवघडल्यासारखे वाटले. इथे लोकांना काढून, त्यांच्या नोकरीच्या बदल्यात मला बढती… नको. त्याने ती जबाबदारी स्वीकारायला नकार दिला, पण त्याचा बॉस त्याला म्हणाला, “ये साली जिंदगी बहोत कुछ सिखाती हैं. तुम जो भी सीखोगे, वो एक दिन तुम्हारे काम जरूर आयेगा. आज तक तूने अलग अलग लीड लोगो कें साथ काम किया, अब तुझे भी आगे बढना तो होगा? भले तुम्हारी कोई बुराई करे… अच्छाई करनेवाले भी बहोत मिलेंगे… All the best !!

ह्या कॉर्पोरेट लाईफमध्ये जगताना अनेकदा आपल्या भावना ऑफिसच्या बाहेर असलेल्या केराच्या टोपलीत फेकून द्याव्या लागतात. आपल्या बॉसला शिव्या देताना आपल्याला काहीच वाटत नाही, पण जेव्हा आपण कोणाचे बॉस होऊ, तेव्हा आपल्याला कोणी शिव्या देणार नाही, याची शाश्वती कोणी देऊ शकेल?

-सुझे :)

पूर्वप्रकाशित – मिसळपाव दिवाळी अंक २०१२

तुमच्या अ‍ॅन्ड्रॉईडसाठी…

१९७३ मध्ये मार्टीन कूपरने मोबाईलचा शोध लावला. तेव्हा त्याने कल्पनादेखील केली नसेल की, हे तंत्रज्ञान इतकं झटपट प्रगत होऊ शकेल. सुरुवातीला मोठ्या लोकांची वापरायची गोष्ट म्हणून मोबाईल ओळखले जायचे. कोणाला फोन करायचा तर १५-१६ रुपये मिनिटाला द्यावे लागायचे. आज निव्वळ भारताचा विचार केला तर, लोकसंखेच्या जवळजवळ ६५ ते ७० टक्के लोकांकडे मोबाईल आहेत. ही आकडेवारी अजून मोठ्या प्रमाणात वाढली असेलच, कारण ही २०१० च्या वार्षिक अहवालानुसार केलेली पाहणी होती.

असो मोबाईलच्या इतिहासावर जास्त बोलायचे नाही. आज आपण मोबाईलचा आत्मा…ऑपरेटिंग सिस्टीमबद्दल थोडे जाणून घेणार आहोत. घाबरू नका… काही लेक्चर वगैरे देत नाही. फक्त हल्ली रोजच्या वापरातली अ‍ॅन्ड्रॉईड प्रणालीसाठी, काही उपयुक्त गोष्टी जाणून घेणार आहोत. जसजसे नवीन तंत्रज्ञान आले, तसे मोबाईल प्रगत होत गेले. मोबाईल्स आता स्मार्ट फोन्स किंवा टॅब्लेट पीसी झाले. लोकांच्या गरजा बघून त्यात रोज काही ना काही बदल घडत गेले आणि त्यासाठी अनेक डेव्हलपर्स दिवसरात्र मेहनत घेत आहेत. सुरुवातीच्या काळात करवंदाची (Blackberry) ओढ असायची लोकांना, ती आजही आहे म्हणा….पण त्यांच्या डेटा सर्व्हर्सवरून झालेला वाद बघता, काही कंपन्यांनी सुरक्षेच्यादृष्टीने करवंद हद्दपार करत, स्मार्टफोन्स दिले. आता थोडी माहिती ह्या स्मार्टफोन्सला स्मार्ट बनवणाऱ्या प्रणालीची.

अ‍ॅन्ड्रॉईड (Android)- इंटरनेट जगतात एकहाती वर्चस्व असणाऱ्या गुगलचा सध्याचा हुकुमाचा एक्का. गुगल सर्च, जीमेल, यु ट्यूब, ऑर्कुट, बझ्झ, अश्या एकसोएक सोयी (व्यसनं) देणाऱ्या गुगलने, २००५ साली अ‍ॅन्ड्रॉईड ही कंपनी विकत घेतली. संपूर्णतः लिनक्सवर आधारीत ही प्रणाली, खूप कमी वेळात प्रसिद्ध झाली. सध्या अ‍ॅन्ड्रॉईडची प्रणाली जेली बिन (Jelly Bean) व्हर्जन ४.१ ग्राहकांसाठी उपलब्ध आहे आणि पुढील व्हर्जनसाठी काजू कतली हे नाव देण्यासाठी कँपेन जोरदार सुरु आहे. अ‍ॅन्ड्रॉईड प्रणाली वापरायला अतिशय सोप्पी आणि ह्या प्रणालीसोबत वापरण्यास लाखो ऍप्लिकेशन्स गुगल स्टोरवर ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत

अ‍ॅन्ड्रॉईडच्या आधी सिंम्बिअन (Symbian) ही प्रणाली अनेक फोन्समध्ये वापरली जायची आणि अजूनही वापरली जाते म्हणा. पण नोकीयाने सिंम्बिअनसोबत असलेला आपला करार गेल्यावर्षी मोडीत काढला आणि त्यांनी मायक्रोसॉफ्ट प्रणाली देण्यास सुरुवात केली. तरी काही नवीन फोन्समध्ये नोकीया सिंम्बिअन देत आहेच. कारण ही प्रणाली हाताळायला सोपी आणि विविध प्रकारचे ऍप्लिकेशन्स फार कमी वेळात सिंम्बिअनसाठी उपलब्ध झाले होते. नोकीया अजून तरी एक वर्ष ही प्रणाली ग्राहकांना देणार आहे आणि त्यानंतर ते पूर्णतः विंडोज बेस्ड फोन देणार आहेत. ह्याला कारण म्हणजे अ‍ॅन्ड्रॉईड आणि सफरचंदाचे (Apple) झपाट्याने वाढणारे मार्केट. विशेषतः अ‍ॅन्ड्रॉईड, कारण ऍपल उपकरणांची किंमत तुलनेने भारतात खूप आहे, त्यामुळे खिश्याच्या दृष्टीने अ‍ॅन्ड्रॉईड परवडेबल आहे. अगदी ८–९ हजारापासून ४० हजारापर्यंत अ‍ॅन्ड्रॉईड स्मार्टफोन्स मिळतात. फार कमी वेळात गुगलने ह्या क्षेत्रात मुसंडी मारली आणि त्यामुळे सिंम्बिअनची लोकप्रियता घटू लागली. त्यामुळेच नोकियाने दुश्मन का दुश्मन दोस्त, ह्या तत्वावर सिंम्बिअन बरोबर आपला करार मोडीत काढून मायक्रोसॉफ्टशी हात मिळवणी केली. (बातमी)

सध्या मायक्रोसॉफ्ट विंडोज ८.० आणि मायक्रोसॉफ्ट ऑनलाईन ऍप्लिकेशन स्टोर वर तुफान काम करत आहेत. तज्ञांचे मत जाणून घ्याल तर, पुढील एका वर्षात गुगलच्या तोडीसतोड ऍप्लिकेशन स्टोर बनवण्याचा त्यांनी चंग बांधलाय. ऍपलचे मार्केट स्टोर सुद्धा खूप मोठे आहे, पण तुलनेने त्यांची ग्राहकसंख्या भारतात कमी आहे. तरीसुद्धा अनेक क्रियेटीव्ह ऍप्लिकेशन्समुळे, त्यांनी त्यांचा वेगळेपणा स्मार्टफोन्स जगतात ठसवला आहे. (अवांतर – मी तर पंखा आहे स्टीव्ह जॉब्सचा आणि त्याच्या कंपनीच्या विविध प्रोडक्ट्सचा, पण खिश्याने दगा दिला…. असो !!)

आता पुढे जे होईल ते होईल, पण तूर्तास आपण काही प्रसिद्ध अ‍ॅन्ड्रॉईड मार्केट ऍप्लिकेशन्सची माहिती करून घेऊ. मी Samsung Galaxy S II हा फोन वापरतोय. तुम्ही वापरलेल्या ऍप्लिकेशन्सची माहिती लेखाच्या प्रतिसादात द्या, आणि कुठले फीचर्स तुम्हाला आवडले वगैरे सांगितले तर उत्तम.

१. WhatsApp Messenger – सुरुवातीला गरीबांचा बीबीएम (BBM – BlackBerry Messanger) म्हणून अनेकांनी ह्या ऍप्लिकेशनची थट्टा उडवली, पण आज सर्वात जास्त वापरले जाणारे ऍप्लिकेशन म्हणून ह्याची नोंद आहे. हे ऍप तुम्ही सिंम्बिअन, ब्लॅकबेरी, ऍपल आणि अ‍ॅन्ड्रॉईड अश्या सर्व प्रणालीवर वापरता येते. इंटरनेटच्या सहाय्याने तुमचा मोबाईल नंबर वापरून तुम्ही जगात कोणाशीही संवाद साधू शकता आणि तेही फुकट.

२. M-Indicator – मुंबईकरांसाठी हे सर्वात महत्त्वाचे ऍप. लोकल ट्रेन्सचं टाईमटेबल, मेगा ब्लॉकचे डायरेक्ट अपडेट्स, बेस्ट बसेसची माहिती, रिक्षा आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे दर पत्रक, मराठी नाटक आणि सिनेमांची माहिती, हिंदी सिनेमांची माहिती, भारतीय रेल्वेच्या PNR स्टेटस जाणून घेण्याची सुविधा अश्या अनेक लोकोपयोगी सुविधांमुळे हे ऍप प्रसिद्ध आहे आणि सर्वप्रकारच्या प्रणालीवर वापरता येते.

३. NewsHunt – अपडेटेड बातम्या तुम्हाला ह्या ऍपमुळे मिळू शकतील. मराठीतील सकाळ, लोकसत्ता, सामना, लोकमत आणि पुढारी ही वृत्तपत्रे तुम्ही वाचू शकता. इतर अनेक भाषांतील वृत्तपत्रेसुद्धा उपलब्ध आहेत.

४. Smart App Protector – तुम्ही वापरत असलेल्या कुठल्याही ऍप्लिकेशन्स परवलीचा शब्द लावून सुरक्षित करू शकता.

५. Wattpad – Free Books & Stories – भरपूर ई-बुक्स आणि कथा संग्रहाचा खजिना. तुम्ही पुस्तके डाऊनलोडसुद्धा करू शकता आणि ऑफलाईन वाचू शकता.

६. मराठीत टाईप करण्यासाठी

A) GO Keyboard आणि देवनागरी प्लगईन

B) PaniniKeypad Marathi IME

C) AnySoftKeyBoard – Devanagari

D) Lipikaar Hindi Keyboard Free

मी चारही प्रकारच्या IME मी वापरून बघितल्या आहेत. त्यातल्यात्यात लिपिकार आणि गो कीबोर्ड आवडले.

७. Hide It Pro – तुमची प्रायव्हसी जपण्यासाठी हा एक प्रकारचा सिक्युरिटी व्हॉल्ट आहे. जिथे तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या फाईल्स ठेवू शकता. ह्यालाही पासवर्ड असतो.

८. Truecaller – Global directory – नावाप्रमाणे ही एक डिरेक्टरी आहे, पण हे ऍप ऑनलाईन रजिस्टर केलेले फोन नंबर्सचा डेटा वापरते. जसे तुम्ही तुमचा नंबर सोशल साईटवर देता, हे असा डेटा जमा करतात. तसेच इंटरनेटवर स्पॅम केलेले नंबर्स दाखवून, तुम्ही त्यांना परस्पर ब्लॉक करू शकता.

९. Scan – आजवर उपलब्ध असलेला सर्वात जलद क्यूआर कोड (QR Code) स्कॅनर.

१०. Justdial – ही पण एक प्रकारची लोक डिरेक्टरी, ज्यात तुम्ही आपल्या जवळपास असलेली हॉटेल्स, मॉल्स, डॉक्टर, हॉस्पिटल्स वगैरे माहिती पत्त्यासकट शोधू शकता.

११. Instagram – फोटो शेअरिंगसाठी अतिशय उपयुक्त.

१२. Autodesk SketchBook Mobile – ह्या ऍपची माहिती अनलिमिटेड भटकंती करणाऱ्या पंकजने दिली. उत्तम ट्रेकर आणि फोटोग्राफर असणाऱ्या पंकजला ह्या ऍपमुळे डूडल्स रेखाटनाचासुद्धा छंद लागला. बाळासाहेब ठाकरे जेव्हा गेले, तेव्हा १० मिनिटात ह्याने श्रद्धांजली म्हणून एक डूडल काढले, जे खूप प्रसिद्ध झाले. काही डूडल्स इथे बघू शकता.

१३. Misalpav – आपल्या लाडक्या मिपाचेही ऍप उपलब्ध आहे बरं :)

१४. TED – तांत्रिक आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण लोकांची माहिती Ideas worth spreading :) :)

१५. Dictionary – Merriam-Webster – शब्दकोश

१६. Any.DO To Do List | Task List आणि Life Reminders – टास्क शेड्यूल करण्यास उपयुक्त

१७. Flashlight HD LED – मोबाईल फ्लॅशचा टॉर्चसारखा उपयोग करणे

बाकी जीमेल, गुगल मॅप्स, फेसबुक, स्काईप, ट्विटरही नेहमीची ऍप्लिकेशन्स आहेतच, पण तुम्हाला माहित असलेली आणि तुम्ही स्वत: वापरलेली ऍप्लिकेशन्स जाणून घ्यायला आवडतील. तुमचे अनुभव नक्की शेअर करा.

- सुझे !!

अखेरचा सलाम…

खरं तर हा लेख लिहायला घेतला, तेव्हा तुम्ही सुखरूप आहात आणि लवकर बरे होत आहात म्हणून तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी….. पण :( :(

जेव्हा कोणी थोडे वयस्क मंडळी गावस्कर काय क्लास खेळायचा वगैरे चर्चा करायची, त्यात मला काडीचाही रस नसे. गावस्करला मी खेळताना बघितलं नाही. त्याने मारलेली शतके, गाजवलेले सामने मला कधी मनापासून आवडले नाही… का? कारण मी लहानपणापासून सचिनचा खेळ बघत आलोय… सचिनचा खेळ अगदी मनापासून अनुभवत मोठा झालोय आणि त्याच्या मारलेल्या एक एका फटक्यावर उत्स्फूर्तपणे दाद देत आलोय. गावस्कर आणि तेंडूलकरबद्दल माझी वैचारिक तुलना, मी घेतलेला अनुभव ह्या एकाच मापकाने केली. बाळासाहेबांबद्दल माझ्या मनात इतका आदर असण्याचे कारण….. त्यांचा थोडाफार अनुभवलेला राजकीय प्रवास. बस्स्स !!

राजकीय घडामोडी घडत राहतात. आपण लोकल, बस, ऑफिस आणि घर इथे चर्चा करत बसतो…पण काही माणसे ह्या विचारांच्या पुढे जाऊन राजकीय परिस्थिती बदलायचे प्रयत्न करतात. एक साधा कार्टूनिस्ट, एका पक्षाची स्थापना करून हिंदूहृदयसम्राट म्हणून मराठी मनावर अभिराज्य करेल हे कोणी स्वप्नात पण सांगू शकलं नसतं, पण बाळासाहेबांनी आपल्या जिद्दीने ते करून दाखवलं. हिंदुत्ववादी विचार आणि मराठी माणसाच्या मदतीला सदैव उभा राहणारा… त्यांच्या पाठीशी राहणारा एक पक्ष त्यांनी तयार केला.. शिवसेना. आज शिवसेनेची हालत काहीही असो, एक मुंबईकर ह्या नात्याने त्यांच्याबद्दल निर्माण झालेला आदर तसूभरही कमी झाला नाही. त्यांचा वरदहस्तामुळेच अनेक राजकारणी नेते पुढे आले आणि त्यांना एकटे सोडून गेले, पण बाळासाहेबांनी कधीही माघार घेतली नाही, आपले विचार बदलले नाही, भले कोणाला काही वाटो. त्यांची एक हाक म्हणजे मराठी मनाला मनापासून घातलेली साद असे समीकरण ठरे आणि ते त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत बदलले नाही. मी शिवसैनिक किंवा मनसे कार्यकर्ता नाही…. मी एक साधा सरळ मध्यमवर्गीय तरुण, जो नोकरी आणि घर ह्याच विश्वात रमणारा. त्यामुळे पूर्णवेळ राजकारणात कधी इतका रस नव्हताच, पण बाळासाहेबांनी केलेल्या कार्यामुळे त्यांच्याबद्दल एक आदरस्थान नेहमी मनात राहिले.

१९९२-९३ ला झालेल्या दंगली कुठलाही मुंबईकर विसरू शकत नाही. त्यावेळी कांदिवली डहाणूकरवाडीमध्ये एका चाळीत राहायचो. वय वर्ष ८. त्यावेळी पोलिसांचा कर्फ्यू वगैरे रोज चालायचं. संध्याकाळ झाली की लोकं बाहेर पडायची आणि मग खरेदी करून घरात गुडूप व्हायची. त्यादिवशी टिव्हीवर चलती का नाम गाडी हा सिनेमा एकाच दिवशी २-३ वेळा दाखवला होता आणि मी तो गाण्यांच्या तालावर नाचत बघितला ही होता. पोलिसांच्या कर्फ्यूनंतर जी लोकं आमच्या भागाची सुरक्षा सांभाळायची, ती शिवसेनेची मंडळी होती. कपाळावर भगवा टिळा, वाढलेली दाढी, दोन-तीन जीप आणि गाडीवर भगवा ज्याला सोनेरी किनार… असा ताफा रस्त्याच्या कोपऱ्यावर येऊन थांबत असे. आता साहजिकच मला माहित नव्हते ही मंडळी कोण? इथे रात्रभर काय करतात? तो विषय तिथेच संपला. मग १९९५ ला पुन्हा तोच भगवा अनुभव पुन्हा आला, पण तेव्हा त्यांची तोंडओळख होती की हे शिवसेना नामकपक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यादिवशी शाळेला कुठलं तरी स्पर्धा परीक्षेत बक्षीस मिळाले होते. आम्हाला पिटीच्या महाजन सरांनी सांगितले की, शाळा सुटायच्या आधी ते मोठ्याने शिटी मारतील. तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करायचा…. पण त्यादिवशी अचानक शाळा लवकर सोडायची ठरले. प्रत्येक वर्गात असलेल्या स्पीकरवरून काही तरी माहिती देत होते, पण आमच्या गोंगाटात ते ऐकू आलेच नाही आणि तेवढ्यात शिटी वाजली आणि आम्ही टाळ्या वाजवायला सुरुवात केली. तो आवाज ऐकून महाजन सर धावत वर आले. एक दोन पोरांना धपाटा घालत म्हणाले…,”अरे नालायक पोरांनो, शिवसेनेच्या मीनाताई ठाकरे गेल्या आणि शिटी मारल्यावर दोन मिनिटांचे मौन पाळायचे होते.” स्पीकरमध्ये झालेल्या बिघाडाने आम्हाला ती बातमी कळली नव्हती… पण आम्ही त्या प्रसंगाने पार हेलावून गेलो. :(

शिवसेनेचे मुखपत्र सामना वाचत वाचत मोठा झालो. बाबांना तो पेपर खूप आवडतो. त्यात बाळासाहेबांचे अग्रलेख, त्यांची परखड मतं, लोकांना त्यांच्याबद्दल वाटणारी आत्मीयता, शिवसैनिक म्हणून मानाने मिरवणारी ती लोकं बघितली, की कौतुक वाटायचे. मराठी माणूस म्हणून आपले वाटायचे. पार्कात होणाऱ्या सभेत त्यांचे होणारे परखड भाषण. पार दिल्ली वाल्यांची फाडून टाकणारी डरकाळी. त्यांच्या भाषणात सगळ्या विरोधकांचा उद्धार, तो पण खास ठाकरी भाषेत. तेव्हा पासून जिथे जिथे त्यांची बातमी, फोटो असायचे ती आवर्जून वाचून काढायचो. बाळासाहेबांचा अभिमान वाटायचा. एक मराठी माणूस म्हणून जास्तच. त्यात ते उत्तम व्यंगचित्रकार. त्यामुळे चित्रातून राजकीय टिका करत असे, ते पण सगळ्यांना हसवत हसवत. त्यामुळे ज्यांच्यावर ती टिका असे, तोही एक क्षणभर हसून ह्या कलाकारीला दाद देत असे.

१९९५ मध्ये जेव्हा विधानसभेवर भगवा फडकला, तेव्हा सेनेचा जोर लक्षणीय होता. मुंबई उपनगरात भगव्याची लाट आली होती. शिवसेना सत्तेवर आल्यावर बाळासाहेबांनी लोकांना एक सुखद आणि हवेहवेसे सरकार दिले. वाघाने मुंबई आपल्या अधिपत्याखाली घेतली. मातोश्री (कलानगर – वांद्रे) येथून नुसत्या महाराष्ट्राच्या नव्हे, तर भारत सरकारच्या नाड्या आवळल्या… त्यालाच राजकारणी रिमोट कंट्रोल असे म्हणायचे. पण नंतर सरकार पालटले… नवीन सरकार आल्या आल्या बाळासाहेबांच्या अटकेचं वॉरंट निघाले. तेव्हा मी साठ्येला होतो. सगळीकडे धावपळ सुरु होती. कॉलेज पूर्ण रिकामी केले गेले, मला कळेनाच काय चाललंय. तेव्हा पानसे सर म्हणाले बाळासाहेबांना पोलिसांनी पकडलं. त्यांच्या आवाजातली अस्वस्थता आणि कळकळ जाणवत होती. मग दोन दिवसांनी भारतीय विद्यार्थी सेनेचा कार्यकर्ता म्हणून फॉर्म भरला आणि राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आंदोलनं होऊ लागली, पण मी हळूहळू त्यातून बाहेर पडलो…..इतकं होऊनही बाळासाहेबांचे आकर्षण नेहमीच राहिले. त्यांचे रोखठोक विचार पटू लागले, किंबहुना अश्या विचारांची देशाला गरज आहे याची शाश्वती झाली. त्यांचे भाषण कधी चुकवायचे नाही. सभेला नाही गेलो तर निदान टिव्हीसमोर बसून त्यांचे ते भाषण ऐकायला कान आसुसले असायचे. पहिल्यांदा कुठल्या राजकीय नेत्यामुळे मी भारावून गेलो असेन.

हा इतका मोठा प्रवास घडताना-बघताना बाळासाहेब वृद्धत्वाकडे झुकत आहेत, ह्याची जाणीव झाली नाही असे नाही… पण मनापासून वाटायचे हा माणूस तिथे पण खंबीरपणे ठाम उभा राहील आणि सांगेल “येत नाही जा… !!”

सत्तरीच्या दशकातले बाळासाहेब …

पाडव्याच्या दिवशी रात्री साधारण १० वाजता मित्राचा मेसेज आला की साहेब गेले….. म्हटलं काही पण सांगू नकोस. तो म्हणाला टिव्ही बघ तेव्हा आज तक, इंडिया टिव्हीवर ब्रेकिंग न्यूज होती की, “बालासाहेब ठाकरे की हालत गंभीर” मग एका मागून एक बातम्यांचा सपाटा लागला. मी माझ्यापरीने बातम्या काढायचा प्रयत्न केला, पण कुठेच काही कळेना. जवळचे मित्रही बोलू लागले ते गेले, आतल्या सोर्समधून बातमी काढलीय. आज सांगणार नाही, दिवाळी आहे. फेसबुक, ट्विटरवर श्रद्धांजलीचा पाऊस सुरु झाला. मी काही मित्रांशी भांडलो. म्हटलं काय त्रास देताय त्या माणसाला. त्याला हे कळलं तर काय वाटेल की, लोकं जिवंतपणी त्याला श्रद्धांजली देत आहेत. माझं तर ह्या प्रकाराने डोकं सटकलं. लोकांना सुट्टीचे डोहाळे लागले, मुंबई बंद होणार, भाऊबीज होणार की नाही … काही निर्लज्ज लोकांनी दारूचा स्टॉक करा असे आवाहन केले. मी त्या सगळ्यांशी भांडू लागलो. मला रडायला येत होते, की चुकून ही बातमी खरी निघाली तर…?

मला काहीच सुचत नव्हते… तेव्हा प्रसादने बाळासाहेबांना उदंड आयुष्य लाभो, असं लिहून कोणीतरी आपल्यासारखा विचार करतोय म्हणून दाखवून दिले. जीवात जीव आला. बाळासाहेबंसाठी प्रार्थना करू लागलो. दुसऱ्या दिवशी कलानगरात जाऊन सुभाष देसाईंना भेटलो,. फार छान वाटले की, आता बाळासाहेब लवकर बरे होतील. मातोश्री बाहेर तिष्ठत उभ्या असणाऱ्या लोकांप्रमाणे, मी ज्या सुखद वार्तेची वाट बघत होतो ती घेऊन माघारी आलो. वाटायचे लवकरच ते मातोश्रीच्या खिडकीत येतील. भगवा सदरा, कपाळावर टिळा आणि हातात रुद्राक्षाची माळ आणि ते हात उंचावून सर्वांना आशीर्वाद देतील…..!!

पण….. आज जेव्हा ही बातमी कळली तेव्हा माझा विश्वास बसत नव्हता. मी तडक सेनाभवनाकडे निघालो…रस्त्यावरची दुकानं बंद होऊ लागली. लोकं पटापटा परतीच्या प्रवासाला लागले. जसा जसा सेनाभवनाच्याजवळ आलो, तशी लोकांची गर्दी दिसू लागली. सूचना फलक लिहायचे काम सुरु होते. एक शिवसैनिक अश्रू आवरत खडूने तो फलक लिहित होता. त्याने लिहिलेल्या एका-एका अक्षराने लोकांचा बांध फुटत होता. डोळ्यांच्या कडा पाणावल्या. सगळे अधूनमधून सेनाभवनाकडे बघू लागले. आज ते फारच ओकेबोके दिसत होते. बाळासाहेबांचा फोटो आणि जय महाराष्ट्र हे शब्द धूसर दिसू लागले. लोकं उत्स्फूर्तपणे तिथे येऊन शांतपणे उभी राहत होती. साऱ्या मराठी जनतेचा विठ्ठल, आज परतीच्या प्रवासाला निघाला याचा विश्वास बसत नव्हता…. पण ते आज गेले. ज्या शिवतीर्थावर ठाकरी तोफ धडाडायची, तिथे त्यांच्या अंत्यदर्शनाची तयारी सुरु झाली :( :(

दिल्लीचा आदेश मुंबईने कधी मानला नाही…मुंबई थांबली ते फक्त मातोश्रीच्या आदेशाने… मुंबईच्या तक्रारी निवारण करण्यासाठी विधानसभेहून जास्त गर्दी मातोश्रीवर होते हेच सिद्ध करते. बाळासाहेबांच्या एका बोटावर मुंबई चालायची. त्यांनी हातात गुंडाळलेल्या रुद्राक्षाच्या माळेचा महिमा कोणाला सांगायची गरज नाही. ह्याच हाताने मराठी अस्मितेवर हल्ला करणाऱ्या लोकांवर शिवधनुष्य उगारले, त्याच हाताने मायेने लाडाने पाठीवरून हातदेखील फिरवला. त्यांच्या जाण्याने ज्या लोकांना भीती वाटली, ते इथे आलेले भिकारी. ज्या लोकांनी बाळासाहेबांचे कार्य बघितले, त्यांचे डोळे अश्रूंनी डबडबून गेलेत.

सेनाभवन सायंकाळी ५ वाजता…

बाळासाहेब माझ्यासाठी कोण होते… काय वाटतं मला त्यांच्याबद्दल मला नाही लिहिता येणार…. सेनाभवनासमोर सूचना फलकावर लिहिलेली ही कविताच खूप काही सांगून जाते….

बाळासाहेबांना वंदना…

बाळासाहेबांना विनम्र श्रद्धांजली….!!

- सुझे !!

द्रोहपर्व – एक विजयगाथा

इतिहासापासून धडा घेतला, तरच भविष्याचा डोळस वेध घेता येतो. आजवर या इतिहासाने आपल्याला बरंच काही शिकवलंय, अजूनही शिकवतोय आणि पुढेही शिकवत राहील. १४ जान्युअरी १७६१ ला पानिपतला झालेला महासंग्राम कोणीही विसरू शकत नाही. मराठ्यांच्या तब्बल सव्वा लाख बांगड्या त्या संग्रामात फुटल्या. सदाशिवराव भाऊंच्या नैतृत्वाखाली मराठे पानिपतात त्वेषाने लढले आणि तेही कोणाबरोबर? धर्माचे रक्षण करण्यासाठी चिथावून आणलेल्या पराक्रमी अब्दालीशी. त्यावेळी भाऊ हे एका धर्माविरुद्ध नाही, तर देशहितासाठी लढले. त्यावेळी त्यांनी तमाम मराठा सरदारांना एकजुटीचे आव्हान दिले होते, पण सगळ्यांनी त्यांची साथ दिली नाही, आणि दिली असली तरी ऐनवेळी त्यांनी पळ काढला होता. भाऊंना ह्या गोष्टीचे शेवटपर्यंत शल्य वाटत राहिले, पण संपूर्ण हिंदुस्थानाची सुरक्षेची जबाबदारी मराठ्यांनी स्वतःवर घेतलेली होती. त्यामुळे त्यांना मागे हटता येणार नव्हती. अनेकांनी त्यांच्या ह्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली, पण त्यांनी जो पराक्रम दाखवला त्यानंतर वायव्येकडून कुठलही परकीय आक्रमण हिंदुस्थानावर झालं नाही.

पानिपतानंतर १७७३ ते १७७९ ह्या काळात मराठा साम्राज्यात घडलेल्या प्रमुख घटनांचा आढावा, लेखक अजेय झणकर ह्यांनी द्रोहपर्व ह्या कादंबरीच्या रूपाने घेतला आहे. ह्या स्पर्धेच्या निम्मिताने, ह्या पुस्तकाची थोडक्यात ओळख करून देण्याचा प्रयत्न करतोय. आशा आहे तुम्ही गोड मानून घ्याल. पुस्तक परीक्षण स्पर्धेची घोषणा झाली, त्याचवेळी नेमकं हे पुस्तक वाचत होतो. सुरुवातीला ह्या पुस्तकावर लिहिणे आपल्यास जमणार नाही म्हणून दुसरे पुस्तक वाचायला घेतले आणि ते संपवलेदेखील. पण वाटलं नाही त्यावर लिहावं…म्हणून परत द्रोहपर्व वाचून काढलं आणि ठरवलं आपल्यापरीने पुस्तकाला न्याय देण्याचा प्रयत्न करायचा. ह्या पुस्तकावर आधारित लवकरचं एक आंतरराष्ट्रीय सिनेमा निर्मितीच्या मार्गावर आहे (सिनेमा युद्धावर नाही आहे, त्यातील एका प्रेम कथेवर आहे – Singularity). तर मग सुरु करूया थोडक्यात ओळख, एका अभूतपूर्व विजयगाथेची.

पानिपतच्या लढाईनंतर काहीकाळ मराठ्यांची देशावरची बाजू साफ उघडी पडली आणि मराठ्यांवर चोहोबाजूंनी लहानसहान आक्रमणे होऊ लागली. निजाम तर संपूर्ण मराठेशाहीला संपवायच्या हिशोबाने चालून आला. मराठ्यांची देवस्थाने, तीर्थक्षेत्र यांची निजामाने पार विटंबना सुरु केली आणि ह्यामुळे निजामाकडे सेवेत असलेले चव्हाण, जाधव असे ताकदीचे मराठा सरदार नाराज झाले. जेव्हा निजाम पुण्याच्या आसपास उरळीस आला, तेव्हा निजामाविरुद्ध उठाव करून, त्याचा कायमचा बिमोड करायच्या हेतूने सारे मराठे सरदार एकत्र झाले. ह्या स्वारीची जबाबदारी राघोबादादांकडे होती. सर्व मराठ्यांनी मिळून ह्या मोगलाचा कायमचा निकाल लावावा असा युद्धाचा आवेश होता. निजामाने घाबरून तहाची बोलणी सुरु केली होती. ती राघोबादादांनी साफ झिडकारून लावावी, अशी सर्वांची इच्छा होती… पण.. पण राघोबादादांनी परस्पर सुलूख घडवून आणला आणि निजाम वाचला. ह्या अवसानघातामुळे अवघ्या पेशवाईस संताप आला, पण करणार काय?

पेशवाईची राजगादी त्यावेळी माधवरावांकडे होती. त्यांनी ही परिस्थिती खूप चांगल्या प्रकारे हाताळली होती. राघोबादादांना वाड्याच्या बदामी महालात बायकोसोबत नजरकैदेत ठेवले गेले. पुढे काही महिन्यांनी आजारपणामुळे माधवरावांचे निधन झाले आणि मग राजगादीची जबाबदारी त्यांच्या धाकट्या भावावर. नारायणरावांवर येऊन पडली. नारायणराव जसे ह्या राजगादीसाठी वयाने लहान (वय वर्ष १७), तसेच स्वभावाचे खूप कच्चे. त्यामुळे त्यांचे कामकाजात जास्त लक्ष नसायचे. कारभारी नाना फडणीस हे सगळी काम बघायचे आणि नारायणराव त्यांच्या हो ला हो म्हणायचे. नाना फडणीस मात्र अतिशय अनुभवी व्यक्तिमत्व होतं. त्यांचा सर्व कारभारावर वचक असायचा आणि त्यामुळे मोठ्ठे मोठ्ठे सरदारदेखील त्यांना बिचकून असायचे. त्यांच्या निव्वळ आगमनाने मोठे सरदार ताठरून जायचे. त्यांच्या कारभारात कमालीची एकसूत्रता, गोपनीयता आणि शिस्त असायची. नानांना साधी तलवार किंवा भाला चालवता येत नसे, पण निव्वळ तल्लख बुद्धीच्या जोरावर ते हा सर्व कारभार सांभाळत असे. वास्तविक पाहता राघोबादादांना (नारायणरावांचे काका) राजगादीवर बसायचे होते. त्यासाठी त्यांनी अनेक वाईट मार्गांचा अवलंबही केला होता, पण ते चुलते असल्याने त्यांना तो मान मिळत नव्हता आणि नारायणराव हे राजगादी मिळवण्यामध्ये असलेला त्यांचा शेवटचा अडसर. तो अडसर कसा दूर करता येईल ह्यासाठी ते सतत प्रयत्नशील असायचे, पण नाना असताना त्यांना ते कधी तडीस नेता येणार नव्हते. नानाचे निव्वळ अस्तित्व त्यांना भीतीदायक वाटत असायचे.

नंतर शनिवारवाड्यात ऐन गणेशोत्सवात चक्रे फिरू लागली. राघोबादादांच्या निवडक लोकांमध्ये पत्रव्यवहार सुरु झाले. सणासुदीचा काळ असल्याने शहरात आणि वाड्यात सैन्याचा पहारा जेमतेम होता आणि नेमकं त्याचवेळी नाना काही कामानिम्मित लोहगडावर मुक्कामी होते. गणेशोत्सव असल्याने, वाड्यावर असलेल्या सगळ्या चौक्या गारद्यांच्या हवाली झाल्या होत्या. गारदी सैनिक पेशवाईच्या लहरीपणाला कंटाळले होते, त्यांचे पगार वेळेवर होत नसल्याने ते असंतुष्ट होते. शेवटी राघोबादादांनी एक शेवटचे पत्र लिहिले आणि त्यात त्यांनी सर्वांना आदेश दिला होता की, “नारायणरावास धरावे” पण राघोबादादांच्या कपटी बायकोच्या मनात काही वेगळेच होते. आनंदीबाईनी “ध” चा “मा” करून, प्रकरणाला वेगळीच कलाटणी दिली. श्रींच्या विसर्जनाच्या आदल्यारात्री गारद्यांनी शनिवारवाड्याचा ताबा घेतला आणि नारायणरावांची अमानुष हत्या केली. श्रीमंतांच्या देहाची अक्षरशः खांडोळी केली. तुळजा नामक सेवेकरणीने ह्या खुनाच्या आदल्यादिवशीच, नारायणरावांना सावध करायचा प्रयत्न केला होता, पण नारायणरावांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केले आणि आज जीवानिशी गेले. काकाने राजगादीच्या लोभापायी पुतण्याचा जीव घेतला.

तुळजाचे बाबा धनाजी नाईक नानांकडे जासूद म्हणून काम करत असे. त्यांनी स्वत: आपल्या मुलीला संपूर्ण युद्धकौशल्य शिकवलं होतं आणि ती त्यांच्या देखरेखीत एकदम तयार झाली होती. नानांनी मुद्दामून तिला सुरक्षेच्यादृष्टीने सेवेकरीण म्हणून वाड्यात नोकरीला ठेवलं होतं. जेणेकरून खाश्या स्त्रियांची सुरक्षा चांगल्याप्रकारे करता येईल. ज्या दिवशी नारायणरावांचा खून झाला, त्यावेळी तुळजा नारायणरावांची पत्नी गंगाबाई समवेत होती. गंगाबाई त्यावेळी गर्भवती होत्या, त्यांच्या पोटी भविष्यातला पेशवा होता. त्यांची सुरक्षा करणे हेच तिचं प्रमुख काम होतं, आणि नेमकं नाना लोहगडावर असल्याने, तिला स्वत:चं सगळे डावपेच आखावे लागत होते. ऐन गणेशोत्सवात ग्रहणासारखे वातावरण पुण्यात झाले होते.

खुनाच्या दुसऱ्याच दिवशी राघोबादादांनी स्वत:च्या नावाची द्वाही पुण्यात फिरवली आणि साताऱ्याच्या छ्त्रपतींकडून पेशवाईची वस्त्रे मागवण्यासाठी पत्र पाठवलं.नाना पेशव्यांच्या वंशात कोणी उरले नसल्याने, तो मान आपसूक राघोबादादांकडे जाणार होता. कोणी काही करू शकलं नाही. सगळे फक्त मनोमन प्रार्थना करू लागले, की गंगाबाईच्या पोटी पुत्र जन्माला यावा आणि मग त्याने पेशवाई राजगादीवर बसावे. तोपर्यंत त्यांच्या जीवाला जपणे जास्त महत्वाचे होते. साक्षात श्रीमंतांचा खून होतो, तिथे गंगाबाई विरुद्ध कपट करणे कठीण नव्हते. पेशवाईची घोषणा करताच, श्रीमंत राघोबादादांनी आपला दरारा आणि पत निर्माण करण्यासाठी, एका मोठ्या मोहिमेची आखणी केली. साबाजी भोसले आणि निजाम एकत्र आल्याने, त्यांचा पाडाव करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी ह्या मोहिमेचे आयोजन केले गेले असे कारण सांगितले गेले. सगळे मात्तबर सरदार, ४०-५० हजारांची फौज आणि शनिवारवाड्यातला जवजवळ सगळा खजिना घेऊन ते मोहिमेला निघाले.

त्याचदरम्यान नानांना इंग्रजांची राघोबादादां समवेत इंग्रजांची वाढती उठबस सलत होती. इंग्रज वकील त्यांच्या गुप्तहेर खात्याची एक तुकडी खास इंग्रज, डच ह्या व्यापारी लोकंवर लक्ष ठेवून असायची. त्यामागे नानांचा दूरदृष्टीपणा होता. ही लोकं कधीनाकधी काही तरी गोंधळ घालणार ह्याची त्यांना खात्री पटली होतीच. त्यांच्या मते परदेशातून इथे हिंदुस्थानात येऊन मातीचे नमुने गोळा करणे, मसाले विकत घेणे, त्यांच्या कागदोपत्री नोंदी ठेवणे, स्वत:च्या रक्षणापुरती शस्त्रे बाळगणे आणि रात्री मनोसक्त दारू पिऊन झोपणारी ही लोकं जास्त धोकादायक होती.

इथे रामशास्त्री प्रभूण्यांनी नारायणरावांच्या खुनाची चौकशी सुरु केली आणि मुख्य आरोपी म्हणून श्रीमंत राघोबादादांच्या नावाची घोषणा करून, त्यांना देहांत दंड भर दरबारात सुनावला. त्याच दरबारात राघोबादादांनी पेशवाईची वस्त्रे घेतली होती आणि आपला शिक्का बनवून घेतला. आता मुख्य आरोपी म्हणून घोषित झाल्यावर ते चवताळले. गेल्या कित्येक वर्षापासून ही राजगादी मिळवण्याची त्यांची प्रबळ इच्छा, आता कुठे पूर्ण झाली होती आणि ती संधी अशी सहजासहजी कशी सोडणार. प्रभूण्यांनी कारभाऱ्यांना शिक्षेची अंमलबजावणी करावी असे सांगितले आणि तोवर अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत ते दरबारात फिरकणार नाही असे ठणकावून बाहेर पडले.

नानांसमोर पेशवाईच्या वारसाची रक्षा करणे ही प्रमुख जबाबदारी होती. सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी गंगाबाई ह्यांना पुरंदरवर हलवले आणि तिथे आसपासच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त केला गेला. देवा-ब्राम्हणांना नवस बोलून झाले आणि हे सार सुरु असताना राघोबादादा गतीने पुढे पुढे सरकत राहिले. पगार वेळेवर न झाल्याने सैन्यामध्ये आणि काही सरदारांमध्ये नाराजी होती. त्यांच्याकडे जेमतेम ७-८ हजारांची फौज उरली होती, तरी त्याचा खर्च करणे त्यांना परवडत नव्हते. हरिपंत दादा हे राघोबांच्या हालचालीवर कायम लक्ष ठेवून असायचेच. कधीतरी मध्येच त्यांना गनिमी काव्याचा हिसका दाखवून जंगलात पळून जायचे.

दरम्यान पुरंदरावर सुरक्षित असलेल्या गंगाबाई प्रसूत झाल्या आणि त्यांनी एका तेजस्वी बाळाला जन्म दिला. देवकृपेने त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले जो पुढे राजगादीवर बसणार होता आणि त्याचवेळी साताऱ्याच्या छत्रपतींनी राघोबादादांची पेशवाई रद्द केली आणि अवघ्या मराठेशाहीत जल्लोष सुरु झाला. सगळीकडे आनंदोत्सव सुरु झाला. राघोबादादांची सर्व बाजूंनी कोंडी करायचा प्रयत्न नाना करत होते, पण काहीनाकाही कमी पडायचे आणि राघोबादादा त्यांच्या हातावर तुरी देऊन निसटून जायचे. हा पाठलाग कित्येक महिने सुरूच राहिला. राघोबादादांनी शेवटचा पर्याय म्हणून इंग्रजांशी बोलणी सुरु केली.

इंग्रजांनी सुरुवातीला हो नाही हो नाही केले, पण त्यांची इच्छा राज्य करण्याची होतीच आणि राघोबादादा आयतेच त्यांच्याकडे मदतीला चालून आले होते. दादांनी पलायन करत करत मदतीसाठी मुंबई गाठली होती. प्रदीर्घ चर्चा आणि वाद झाल्यावर इंग्रज अधिकाऱ्यांनी दादांना मदत करतो असे वचन दिले. त्याबदल्यात इंग्रजांना किनारपट्टी परिसरात असलेले महत्त्वाचे किल्ले जसे वसई, साष्टी आणि युद्धाचा संपूर्ण खर्च देण्याचे कबूल झाले. इंग्रजांनी आपल्या कवायती तुकड्या सज्ज केल्या आणि ते मराठ्यांविरुद्ध लढायला तयार झाले. नानांना ह्या सर्व गोष्टीची कल्पना होतीच आणि अवघ्या मराठी सरदारांनी पुन्हा एकत्र येऊन ह्या इंग्रजांचा पाडाव करावा असे आवाहन केले. ह्या मोहिमेची सर्व सूत्रे पाटीलबाबा म्हणजे महादजी शिंद्यांकडे होती.

इंग्रजांच्या आधुनिक हत्यारांपुढे हे युद्ध मराठ्यांना जरा कठीणच जाणार होते, पण मराठ्यांकडे सैन्य भरपूर होते आणि मुंबई पुण्याची वाट घनदाट जंगलातून आणि दरी खोऱ्यातून होती. त्यामुळे शत्रूला गनिमी काव्या युद्धतंत्र वापरून शत्रूला नामोहरम करायचे आणि त्यांची ताकद कमी करत रहायची अशी योजना होती. इंग्रजांच्या वाटेवर असलेली सर्व खेडी-गावे रिकामी करून त्या सर्वांना चिंचवड परिसरात स्थलांतरित केले गेले. इंग्रजांना आयती रसद मिळू नये, हेच त्यामागचे उद्दिष्ट. उभी पिकं मराठ्यांनी जड अंत:करणाने जाळून टाकली, विहिरी, तलावात विष टाकले आणि इंग्रजांचा सामना करण्यास सज्ज झाले.

कार्ला लेणी परिसरात पुढे वडगावात ही निर्वाणीची लढाई झाली. ही लढाई मराठे जिंकले. इंग्रजांना अगदी कोंडीत पकडून, सपशेल माघार घ्यायला लावली मराठ्यांनी. योगायोगाची गोष्ट म्हणजे हा विजय मकरसंक्रांतीच्या दिवशीच मिळाला. अठरा वर्षापूर्वी मकरसंक्रांतीच्या दिवशी पानिपतावर मराठ्यांच्या घरातल्या बांगड्या फुटल्या आणि १७७९ साली मकरसंक्रांतीच्या दिवशी मराठ्यांच्या घराघरांवर गुढ्या.. तोरणं उभारली गेली…त्याचीच ही कादंबरीमय विजयगाथा.

ह्या युद्ध्याच्या विजयगाथेने ह्या कादंबरीचा शेवट होतो. लढाई कशी झाली ह्यावर सविस्तर मी मुद्दाम इथे लिहित नाही, कारण ते तुम्ही स्वत: वाचून अनुभवायला हवे. अजेय सरांनी ह्या युद्धाचे अतिशय विस्तृत वर्णन ह्या कादंबरीत केलेलं आहे. त्यासाठी अनेक नकाशे आणि इंग्रज दरबारी असलेली कागदपत्रेही सोबत दिली आहेत. ही लढाई इंग्रजांनी इतिहासाच्या पानात दडवून ठेवलेली होती. मराठ्यांच्या ह्या अभूतपूर्व पराक्रमाची ओळख करून देणारी ही कादंबरी नक्की वाचा.

- सुझे !!

( पूर्वप्रकाशित – मीमराठी.नेट पुस्तक परीक्षण स्पर्धा )

MH-02-XA-40X2 – भाग अंतिम

भाग पहिला – MH-02-XX-4XXX – भाग पहिला

भाग दुसरा – MH-02-XX-4XX2 – भाग दुसरा

भाग तिसरा – MH-02-XA-4XX2 – भाग तिसरा

अरुणने रात्री उशिरा केलेले आणि पहाटे केलेले फोन त्यांच्यासाठी एक महत्वाचा दुवा होता. अचानक काहीसे आठवून त्यांनी ऑपरेटरला फोन लावला आणि तपासाला काही तरी दिशा मिळाल्याचे एक समाधान त्यांच्या चेहऱ्यावर तराळले…

इन्स्पेक्टर भालचंद्र रावत जातीने ह्या प्रकरणात लक्ष घालत होते. त्यांच्यावर इतर जबाबदाऱ्यादेखील होत्या, पण ही केस त्यांनी अगदी प्रतिष्ठेची करून घेतली होती. जमेल तितके पुरावे आणि माणसांची जबानी ह्यात घेतली गेली. दोन दिवसांनी मुंबईला जाऊन एकनाथची साक्ष घेण्याचे मनसुबे उद्ध्वस्त झाले. कारण चार दिवसांनी भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील एका खाजगी कार्यक्रमासाठी नागपुरात येणार होत्या. त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी आणि त्या जिथे जिथे कार्यक्रमाला जातील, त्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्याची जबाबदारी पोलिसांवर आली. अचानक आलेल्या या जबाबदारीमुळे त्यांच्या तपासातली एकसूत्रता भंग पावली. रस्त्याची गस्ती, संशयित लोकांची धरपकड आणि हॉटेल्सची झडती हीच कामे त्यांच्या मागे लागली.

इकडे मुंबईत बॉबी आणि जयेशभाई आपल्या धंद्यात गुंतले. रोजची गाडीभाडी, बस तिकीट बुकिंग आणि सोबतीला सायबर हे वेळापत्रक सुरु झाले. मध्यंतरी दोन-तीनदा बॉबीने रावतांना फोन केला, पण तो त्यांनी कामात असल्यामुळे कट केला. गाडी जाऊन आता १४-१५ दिवस झाले होते. इतक्या दिवसात गाडी पूर्ण सुटी करून किंवा जशीच्यातशी कोणाला तरी विकली असेल. त्यामुळे पोलिसांचा तपास पुढे जाणार नाही याची त्यांना खात्री पटली. रोज सकाळ-संध्याकाळ जयेशभाई बॉबीच्या ऑफिसात मेरा नुकसान हो गया, कर्जे मैं डूब गया म्हणून रडगाणं गात असे. बॉबीला ते निमुटपणे ऐकून घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसे. असे दिवस जात राहिले.

होता होता महिना झाला. सकाळी सकाळी रावतांनी जयेशभाईंना फोन केला. “रावत बोलतोय… दाढी खूप वाढलीय. चारकोपला येतोय दाढी करायला. ” जयेशभाई काही म्हणेपर्यंत समोरून फोन कट झाला होता. जयेशभाईंना काय कळावे सुचले नाही. ते तडक बॉबीकडे निघाले. त्याचं ऑफिस त्याच्या घरापासून अगदी दोन इमारती सोडून होतं. बॉबी ऑफिसमध्ये सिगारेट पीत बसला होता. जयेशभाईंचा असा प्रश्नार्थक चेहरा बघून तो तडक बाहेर आला आणि हातातली सिगारेट फेकून दिली. “क्या हुआ जयेशभाई??”

त्यांनी झालेला प्रकार बॉबीला सांगितला. आता बॉबीदेखील विचारात पडला. बॉबीचा सायबर जिथे होता, त्या इमारतीत एक दुधवाला, एक ब्युटीपार्लर, एक दातांचा दवाखाना, एक किराणामाल दुकान, एक दागिन्यांचे दुकान आणि एक हेअर कटींग सलून होते. सगळे तसे बॉबीला चांगले ओळखायचे आणि त्याला मानायचेसुद्धा. बॉबीने तातडीने रावतांना फोन करायचा प्रयत्न केला, पण फोन बिजी आला. त्याने वैतागून फोन कट केला आणि सिगारेट पेटवली.

पाच मिनिटांनी जे दृश्य बॉबी आणि जयेशभाईंना दिसले, त्यावर त्यांचा स्वत: विश्वास बसत नव्हता. डोळे फाडून ते एकटक तिथे बघत राहिले. इन्स्पेक्टर भालचंद्र रावतसमोर एका गाडीत बसलेले आणि ही तीच गाडी जी चोरीला गेली होती. जयेशभाईंच्या उत्साहाला पारावर उरला नाही. ते धावत गाडीपाशी गेले आणि गाडी न्याहाळू लागले. रावत त्यांच्या पाठीवर हात ठेवत म्हणाले, “हो हो तुझीच गाडी आहे.” आणि ते बॉबीच्या दिशेने निघाले. बॉबीशी हात मिळवत, बाजूला असलेल्या खुर्चीवर बसले. मागून एक पोलिसांची जीप आली आणि ती थोडं अंतर ठेवून उभी राहिली. पोलिसांच्या गाडीतून कोणी उतरले नाही, सगळे होते तसेच बसून राहिले. नंतर दोन मिनिटांनी रिक्षातून एकनाथ उतरताना दिसला. तो पूर्णपणे घामाने थिजलेला होता. त्याचा एक गाल लालसर सुजला होता. हाताने गाल दाबत तो बॉबीच्या ऑफिससमोर आला. बॉबीला त्याच्या सुजलेल्या गालाची कहाणी न सांगता कळली होती.

रावत एकदम गडबडीत उठले आणि बाजूला असलेल्या हेअर कटींग सलूनमध्ये घुसले. जीपमधून एक हवालदार उतरून त्या सलूनच्या बाहेर उभा राहिला. रावतांनी बॉबी, जयेशभाई आणि एकनाथला आवाज दिला आणि सलूनमध्ये यायला सांगितले. एअर कंडीशन वातावरणामध्ये ते एका खुर्चीवर जाऊन बसले. सलूनवाल्याने न सांगता स्पेशल दाढीची तयारी सुरु केली. रावतांनी हातातले घड्याळ आणि अंगठी समोर काढून ठेवली. युनिफॉर्मच्या शर्टाची दोन बटणे काढून, त्या खुर्चीत निवांत बसले. सलूनमध्ये अजून दोन कारागीर होते, जे टीव्ही बघण्यात मग्न होते. रावतांना समोरच्या आरश्यात मागे उभ्या असलेल्या तिघांचे चेहरे साफ दिसत होते. दाढीचा एक हात मारून झाला.रावत काहीच बोलले नाही. एव्हाना मागे उभ्या असलेल्या ह्या तिघांची चुळबूळ सुरु झाली. एकनाथने धीर एकवटून विचारले, “साहेब, मी बाहेर थांबू का? मला एसी चालत नाही. लगेच सर्दी होते” रावतांनी समोरच्या आरश्यात काहीसे नाराजीने बघितले, आणि त्यांची आणि एकनाथची नजरानजर झाली. एकनाथ काय समजायचं ते समजला.

दाढी करणाऱ्या पोरालामध्येच थांबवून, रावत मागे वळले, “मग जयेशभाई, तुमची गाडी मिळाली. एकदम सुखरूप. गाडीवर एक साधा ओरखडादेखील नाही. खुश नं?” जयेशभाई तडक पुढे झाले आणि रावतांशी हात मिळवत म्हणाले, ” खूप उपकार झाले, बहोत बहोत शुक्रिया. पर गाडी मिली कहां पें. खुनी पकडे गयें?” रावत नुसते हसले, “मानेने होकार देत, परत दाढी करायला बसले” त्या पोराने तोंडाला फेस लावला आणि वस्तरा घेऊन दाढी सुरु केली. दाढीनंतर आपल्या तुळतुळीत चेहऱ्यावर हात फिरवत त्यांनी पोराला दाढीचे पैसे दिले. आता ते जयेशभाईकडे वळले आणि बोलू लागले..

“मी मुंबईला कालच आलो. जेव्हा आलो तेव्हा तडक एकनाथचं ऑफिस गाठलं. निव्वळ पैश्यासाठी धंदा करणारा हा मनुष्य, त्यामुळे त्याला जिथून फोन आला, त्या नंबर व्यतिरिक्त मला काही सापडले नाही. पण एकनाथने गुन्हा केला होता आणि त्याची त्याला काहीतरी शिक्षा मिळायला हवी म्हणून त्याला पोलिसी हिसका दिला. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, दोन दिवसांपूर्वी अशीच एक गाडी गोराईइथून मिसिंग आहे. हंपीला जातो म्हणून ती गाडी भाड्याने घेतली गेली, पण ती निर्वाचित स्थळी कधी पोचलीच नाही. गाडीची अजून काही माहिती नाही, आणि ड्रायव्हरशी काही संपर्क होत नाही. परवा रात्री त्याने शेवटचा फोन केला… बस्स्स !!! शेवटच्या फोनवरून आठवलं की अरुणने रात्री झोपताना आणि सकाळी निघताना जयेशभाईंना फोन केला होता. त्या फोन रेकोर्डच्या आधारे, जवळ असलेल्या मोबाईल टॉवरमधून कनेक्ट झालेले सगळे फोन आम्ही तपासले. जवळजवळ ७४० फोन नंबर्स आम्हाला मिळाले. सर्वांचा अभ्यास सुरु झाला. प्रत्येक नंबरचा मालक कोण, मालकाची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे की नाही ते तपासले. ७४० फोन्स मधून आम्ही ५ संशयित नंबर बाजूला काढले. ४ फोन्स मध्यप्रदेशातले आणि एक मुंबई इथला. फोन रेकॉर्डिंग मिळणे अशक्य असल्याने, आम्ही परस्पर त्या मोबाईलच्या पुढच्या हालचालींवर काही दिवस नजर ठेवून राहिलो.”

“बाकी जरावेळाने सांगतो, पण आधी गाडी कशी मिळाली ते सांगतो. मध्यप्रदेश कोर्टात जेव्हा तपासाची एक कॉपी द्यायला गेलो. तेव्हा कोर्टाच्या आवारात गाडीतच बसून मी आणि माझे सहकारी चहा पीत बसलो. इतक्यात माझ्या गाडीसमोर एक कोरी करकरीत ईनोव्हा येऊन थांबली. नेहमीप्रमाणे माझी संशयी नजर गाडीवरून फिरली. गाडीला MP ची पिवळी नंबर प्लेट होती, त्यामुळे ही ती गाडी नाही म्हणून मी चहा पिऊ लागलो. अचानक काही तरी ओळखीचं बघितल्यासारखं मी गाडीकडे बघितलं. गाडीच्या मागच्या काचेवर एका कोपऱ्यात हनुमानाचा फोटो होता आणि फोटोखाली गुजरातीत लिहिलं होतं जय बजरंग बली !!”

“गाडीच्या ड्रायव्हरकडे चौकशी केल्यावर कळले, की मध्यप्रदेशातले नावाजलेले वकील रामप्रकाश गुप्ता यांची ती गाडी आहे आणि दहा दिवसांपूर्वीच विकत घेतली आहे. रावतांनी गाडीचे पेपर बघितले आणि ते बरोबर होते. हे पेपर बनवणे किती सोप्पं आहे, हेही ते ओळखून होते. गाडीचा मालक वकील असल्याने मी तिथे जास्त चौकशी केली नाही” कोर्टाचे काम संपल्यावर वकील आपल्या गाडीत बसून निघाले आणि मागोमाग आम्ही निघालो. एका निर्जन रस्त्यात त्यांना गाठून वकिलांची पोलिसीतऱ्हेने चौकशी केली आणि त्यात तो वकील भडाभडा ओकला. त्याला स्वतःची बदनामी करायची नव्हती, त्यामुळे त्याने ती गाडी कुठून घेतली वगैरे सांगितले आणि एका तासात आम्ही त्या तिघांपैकी एकाला पकडला आणि बाकी दोघे पळून जाण्यात यशस्वी ठवले. त्या तिघांनी ही गाडी ७ लाखांना विकली होती. गाडी चोरल्यावर पाच दिवसात गाडीचे पेपर बनवून तिचे MP पासिंग करून, ट्रान्सपोर्ट परमिट घेतले होते. वकील साहेबांचे जितके चांगले संबध चांगल्या लोकांशी तितकेच चांगले संबंध गुन्हेगार लोकांशी होते. त्या वकिलाकडून कोऱ्या कागदावर सही आणि शिक्का घेऊन त्याला गाडी हवाली करायला सांगितली. वकिलाच्या माहितीनुसार ज्याला पकडला तो याक्षणी बाहेर गाडीत बसून आहे.”

एकनाथ मध्येच त्यांना तोडत म्हणाला, “मग तो फोन त्यानेच केलेला का?”

रावते गालात हसले, “ज्याने फोन केला, त्या माणसाला गाडीची आणि आजूबाजूला असणाऱ्या लोकांची माहिती होती. कुठल्या गाफीलक्षणी आपण ती गाडी पळवून नेऊ शकू याचे त्यांनी विशेष प्लान्निंग केले होते. तुला ज्या नंबरवरून फोन आला गाडीसाठी, त्याचं नंबरवर रात्री आणि पहाटे असे एक एक फोन गाडीतून आले. ते फोन चारकोपमध्येच उचलले गेले अशी माहिती आम्हाला मोबाईल कंपनीने दिली. नंतर काही काळाने तो फोन बंद झाला आणि त्याच लोकेशनवर दुसरा फोन डिटेक्ट झाला तोच तो संशयित नंबर मुंबईचा. त्या टॉवरवर तो नंबर लोकेट झाला आणि गाडीतून त्या नंबरवर एक फोन केला गेला. सकाळी ८:३०ल देखील मध्यप्रदेशमधून त्या नंबरवर फोन केला गेला”

“मग तो नंबर कोणाचा??” एकनाथ उत्सुकतेने विचारू लागला..

“तो नंबर इथलाच, ह्या सलूनमधला. हाच तो पोरगा जो त्या टोळीला गाड्यांची माहिती देत होता. धंद्यात नवीन आहेत साले, कळत नाही कोणाशी पंगा घेतलाय त्यांनी.. थोड्याश्या पैश्याच्या मोबदल्यात नवीन गाड्यांची माहिती काढायची आणि मग ती त्या टोळीला कळवायची” हे ऐकताच बॉबीला धक्का मारून तो मुलगा पळून जाऊ लागला, पण बाहेर हवालदाराच्या काठीचा एक फटका बसल्यावर जागच्याजागी विव्हळत बसला.त्याने सगळा गुन्हा कबूल केला आणि २० हजाराच्या मोबदल्यात हे काम केल्याचे सांगितले. लवकर श्रीमंत व्हायची इच्छा हेच गुन्हा करण्यामागे मुख्य कारण होते.

इन्स्पेक्टर भालचंद्र रावत आणि तिघेजण बाहेर आले. बाहेर बेड्या घातलेला तो तरुण हमसून रडत होता, आणि हात जोडून माफी मागत होता. रावतांनी त्याच्याकडे तुच्छतेने बघितले आणि शिवी हासडून म्हणाले, “भेट भडव्या पोलीस कोठडीत, नागवा करून ह्या बेल्ट ने फोडतो तुला” एव्हाना रस्त्यावर बघ्यांची गर्दी झाल्याने, रावतांनी हवालदाराला इशारा केला आणि हवालदार पोराला जीपमध्ये कोंबून चारकोप पोलीस स्टेशनकडे भरधाव निघाले. रावतांनी बॉबी, जयेशभाईंचे आभार मानले. एकनाथच्या सुजलेल्या गालावर हलकेच चापटी मारत म्हणाले, “मी कधीतरी गाडी हवी म्हणून खोटा फोन करेन आणि जर तू आता केलेला प्रकार पुन्हा केलास, तर माझा हात आहे आणि तुझे गाल आहेत… समजल??” एकनाथने शरमेने होकारार्थी मान हलवली.

रावत पोलीस स्टेशनकडे निघता निघता मागे फिरले, “Bobee, Can I have one smoke?” बॉबीने संपूर्ण पाकीट त्यांना देऊ केले, “नको नको, एक पुरेशी आहे. नवीन बाबा झालोय. बायकोला कळलं तर माझ्या बाळाला मला जवळ घेऊ द्यायची नाही. सिगारेट सोडायची आहे. तू पण सोड…. चल Byeee”

!! समाप्त !!

तळटीप – ह्या सर्व प्रकारानंतर जयेशभाईंनी पनवती गाडी विकायची ठरवली आणि ती गाडी बॉबीने विकत घेतली. गाडी पळवणाऱ्या टोळ्यांना ही गाडी म्हणजे एक चपराक होती आणि त्याचा बदला म्हणून ह्या गाडीवर आजही विशेष पाळत असते. पण गाडी बॉबीच्या ताब्यात आहे आणि तो ती कुठल्याही अनोळखी लोकांना देत नाही. हल्लीच नाशिकला जाताना बॉबीकडे गाडी मागितल्यावर त्याने विश्वासाने ही गाडी मला दिली. तेव्हा मला भाग तीन आणि चारचा सविस्तर वृत्तांत राजूकडून कळला. तरी भाग तीन आणि चार हे बऱ्यापैकी काल्पनिक आहेत. आजही राजू दिमाखात आणि निर्धास्तपणे ती गाडी चालवतोय आणि चालवत राहील ह्यात शंका नाही….!!

– सुझे !! :) :)